पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहराला गेल्या तीन महिन्यांपासून दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करून तो पुन्हा दररोज करावा, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातील पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात पाणीसाठा कमी झाला की शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्यात धरणात पाणीसाठा कमी झाल्यानंतर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची ६ मे २०१९ या दिवसांपासून अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे गेली तीन महिने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला. परंतु, नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून नागरिकांनीही काटकसरीने पाण्याचा वापर करून प्रशासनाला सहकार्य केले आहे. परंतु, आता पवना धरण परिसरात दमदार पाऊस पडत आहे. धरणाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या वर पोचला आहे. त्यामुळे शहराला गेल्या तीन पावसांपासून करण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करून नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करावा, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.