पिंपरी (Pclive7.com):- गेल्या आठवडा भरापासून मावळ परिसरात धुव्वांधार पाऊस सुरू असल्यामुळे पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ८१.२३ टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पवना धरणाचा पाणीसाठा १३ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. मात्र १ जून पासून पाऊस सुरू झाल्याने दररोज पाणीसाठ्यात भर पडू लागली आहे. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाण्यासाठ्यात ६.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या धरणात ८१.२३ टक्के (६.९१ टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरण ९७.१७ टक्के भरले होते. पवना धरण क्षेत्रात या पावसाळ्यात १ जून पासून एकूण १८७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा उशिरा पाऊस सुरू होऊन देखील तो मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या जवळपास पोचत आला आहे. या पावसाळ्यात पाणीसाठ्यात ६६.७७ टक्के वाढ झाली असून त्यापैकी ६.९९ टक्के म्हणजेच सुमारे सात टक्के वाढ कालच्या एका दिवसात झाली आहे.