पिंपरी (पीसी लाईव्ह न्यूज):- पिंपरी चिंचवडकरांची पाणीकपात लवकरच रद्द होणार आहे. गेल्या आठवडा भरापासून मावळ परिसरात धुव्वांधार पाऊस सुरूच असल्यामुळे पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ८४.८७ टक्के भरले आहे. पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पवना धरणाचा पाणीसाठा १३ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. मात्र १ जून पासून पाऊस सुरू झाल्याने दररोज पाणीसाठ्यात भर पडू लागली आहे. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाण्यासाठ्यात ३.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त धरणातील पाण्याच्या साठ्याचा लवकरच आढावा घेणार असून पाणी कपात रद्द होणार आहे.
सध्या धरणात ८४.८७ टक्के (७.२२ टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरण ९७.१७ टक्के भरले होते. पवना धरण क्षेत्रात या पावसाळ्यात १ जून पासून एकूण १९३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत २१२८ मिलीमीटर पाऊस पडला होता. यंदा उशिरा पाऊस सुरू होऊन देखील तो मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या जवळपास पोचत आला आहे. या पावसाळ्यात पाणीसाठ्यात ७०.४१ टक्के वाढ झाली असून त्यापैकी ३.६४ टक्के म्हणजेच सुमारे चार टक्के वाढ कालच्या एका दिवसात झाली आहे.