नवी दिल्ली (Pclive7.com):- शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. त्यामुळं ही राज्याच्या राजकारणासाठी मोठी घडामोड ठरली आहे.
कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं आज स्पष्ट केलं की, हे प्रकरण संविधानिकदृष्ट्या महत्वाचं आहे, त्यामुळं त्यावर तातडीनं सुनावणी होऊ शकत नाही. उद्याही याबाबत सुनावणी होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घेऊ नये असं कोर्टानं आज सांगितलं.
दरम्यान, आजच सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होईल असं वाटतं होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून होतं. यावर बरीच राजकीय गणितं देखील अवलंबून आहेत. यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तारही थांबल्याचं सांगितलं जात आहे. पण आजच्या दिवशी हे प्रकरण कोर्टासमोर आलं नाही. यावरुन शिवसेनेच्यावतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी कोर्टासमोर नाराजी व्यक्त केली. कारण हे गंभीर प्रकरण आहे. यावर सरन्यायाधीशांनी म्हटलं की, हे प्रकरण संविधानिकदृष्ट्या खूप महत्वाचं आहे. घटनात्मक पैलू यामध्ये आहेत. त्यामुळं तातडीनं यासाठी खंडपीठाची नियुक्ती होऊ शकलेली नाही.