पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी प्राधिकरण येथील निवासी भागातील कचरा संकलन केंद्र इतरत्र स्थलांतरित करावे. पिंपरी भाजी मंडई गाळेधारकांचे प्रलंबित प्रश्न, प्राधिकरण एलआयसी कॉलनीतील नागरिकांच्या अडचणी व भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना आदी विषयांवर आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब लक्ष द्यावे आणि निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी केली.
शुक्रवारी पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलेजा मोरे, डब्बु आसवाणी, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रसाद शेट्टी तसेच अनुप मोरे, सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सतीश लांडगे, प्रतीक इंगळे व प्राधिकरण परिसर व मतदार संघातील नागरिक उपस्थित होते.
आकुर्डी प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली. तर इतर मागण्यांबाबत पुढील आठवड्यात विभागवार बैठक घेऊन निर्णय घेऊ. असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे असे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे.