पिंपरी (प्रतिनिधी):- कविता हा केवळ यमकांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे यमक शब्दांचा संग्रह जेवढा जास्त तेवढी कविता जास्त प्रभावी बनते. अशा प्रकारचा प्रघात आता सुरु आहे, असे मत कवी आणि गीतकार वैभव जोशी यांनी टाटा मोटर्स कलासागर या ३७ व्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी व्यक्त केले.
टाटा मोटर्सच्या ‘कलासागर’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन निर्माते, संगीत दिग्दर्शक, कवी आणि गीतकार वैभव जोशी यांच्या हस्ते झाले. प्रकाशन सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना वैभव जोशी बोलत होते. यावेळी मानव संसाधन विभाग प्रमुख सरफराझ मणेर, पद्माकर कुलकर्णी, कामगार युनियनचे खजिनदार वाय. के. चव्हाण, सुरेश जासूद, टाटा मोटर्स कलासागरचे अध्यक्ष सुनील सवाई, अचिंत्य सिंग, मकरंद गांगल, वीरेंद्र वायाळ, उत्तम चौधरी, मयुरेश कुलकर्णी, सुनील अधाटे आदी उपस्थित होते.
टाटा मोटर्समध्ये ज्याप्रमाणे वाहनाच्या निर्मितीसाठी लहान-लहान सुट्या भागांची आवश्यकता असते. ते सुटे भाग जोडून दिमाखदार वाहन तयार होते. त्याप्रमाणे लहान लहान शब्दांचा संग्रह कवितेसाठी आवश्यक असतो. शब्द-शब्द जोडून सुंदर कविता तयार होते. अशा प्रकारे कविता व वाहनांच्या निर्मितीमधील साम्य वैभव कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
भावना व्यक्त करण्याचे किंवा अभिव्यक्त होण्याचे साधन म्हणजे साहित्य आहे. लिहिण्यासाठी योग्य व्यासपीठाची कमतरता भासू लागल्याने सामाजिक माध्यमांचा उपयोग भावना व्यक्त करण्यासाठी केला जात आहे. फेसबुक, व्हाट्स अॅप, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या विविध सामाजिक माध्यमांमधून अनेक लेखक व कवी तयार होत आहेत, असे सांगत कवी ग्रेस, गुलजार आणि किशोर कदमांविषयीच्या आठवणींना यावेळी कुलकर्णी यांनी उजाळा दिला.
यावर्षीचा कलासागर हा दिवाळी अंक २१६ पानांचा असून त्यामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधील साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे. १७४ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी यासाठी आपले साहित्य दिले आहे. कामगारांमध्ये साहित्यातील असलेला छंद यानिमित्ताने जोपासण्यासाठी वाव मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश कुलकर्णी यांनी केले. आभार अचिंत्य सिंग यांनी व्यक्त केले.