पिंपरी (प्रतिनिधी):- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे भाजपात जाणार असं पसरविणे भाजपच्या ‘अफवा ब्रिगेड’चे काम आहे. जाणीवपूर्वक भाजपातील काहीजण ही पसरवत अाहेत. हे दोन्ही खासदार कुठेही जाणार नाहीत असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
चिंचवड येथे तीनही विधानसभा निहाय शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.
शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि श्रीरंग बारणे हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून ऊत आला होता. दरम्यान, या दोनही खासदारांनी आपण शिवसेनेतच राहणार असून आगामी लोकसभा निवडणुक देखील शिवसेनेकडूनच लढविणार असल्याचेही, यापूर्वी स्पष्ट केले होते. तरी देखील या चर्चा सुरुच होत्या.
याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्या उजव्या बाजूला खासदार आढळराव पाटील आणि डाव्या बाजूला खासदार आप्पासाहेब बारणे बसले आहेत. काही दिवसांपूर्वी ते दोघेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसले होते. त्यामुळे ते शिवसेना सोडून कुठे जाणार नाहीत, हे स्पष्ट आहे. परंतु, भाजपमध्ये अफवा ‘ब्रिगेड’ काम करत आहे, ही ब्रिगेड अशा खोट्या अफवा पसरवत आहे.