पिंपरी (Pclive7.com):- लग्न समारंभात चोरीला गेलेले तब्बल २६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली आहे. रितीक महेश सिसोदिया (वय २०), वरुण राजकुमार सिसोदिया (वय २३), शालु रगडो धपानी (वय २८), शाम लक्ष्मिनारायण सिसोदिया (वय ३८) सर्व राहणार मध्यप्रदेश अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील ऑर्कीड हॉटेलमध्ये ६ डिसेंबर २०२२ रोजी लग्न होते. यावेळी चोरट्यांनी या लग्नात तब्बल ६५ तोळे सोने व ९ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. पोलिसांनी हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता दोन अनोळखी इसम हे फिर्यादीच्या आईची पर्स घेऊन गेल्याचे दिसले. पोलिसांनी कसून तपास चालु केला असता आरोपी हे मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्ये गेले तेथे त्यांनी तपासासाठी १७ दिवस वास्तव्य केले.
यावेळी त्यांनी रितीक व वरूण यांनी त्यांचे साथीदार शालु व शाम यांच्या सोबत मिळून चोरी केली असून त्या चोरीतील काही मुद्देमाल हा त्यांच्या घरी म्हणजे बोडा, जि. राजगढ येथे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी आरोपींचे नातेवाईक व शेजारी यांच्याकडून माहिती घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरी छापा टाकला. त्यावेळी तेथे ५२ तोळे वजनाचे २६ लाख रुपयांचे दागिने सापडले. आरोपी मात्र तेथून फरार झाले होते. आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर विविध राज्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उर्वरीत दागिने व आरोपींचा शोध घेत आहेत.
हि कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, बंडू मारणे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण,कारभारी पालवे, सुभाष गुरव, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडित यांनी केली.