नवी दिल्ली (Pclive7.com):- महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ही १४ फेब्रुवारीला होणार आहे. शिवसेनेतली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच सत्तासंघर्षावर ठाकरे आणि शिंदे गटाकडूनही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
ऑगस्ट २०२२ रोजी घटनापीठामध्ये सुनावणीला सुरुवात झाली. शिवसेना आणि शिंदे गटाच्यावतीने आपआपले दावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. सात सदस्यीय घटनापीठाने या मुद्द्यांचा फेरविचार करावा तसेच सुनावणी करावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. आता १४ फेब्रुवारीला सलग सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निकाल आता पुढील महिन्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगापुढेही धनुष्यबाण कुणाचे?, यावर शिंदे आणि ठाकरे गटाकडून बाजू मांडली जाणार आहे. दोन्ही गटांकडून लाखो सदस्यांचे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही धनुष्यबाणाबाबत निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.