पिंपरी (Pclive7.com):- किवळे येथे अनधिकृत होर्डिंग पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना महापालिकेने आर्थिक मदत द्यावी. होर्डिंग मालक, जागा मालक, चालकांवर गुन्हे दाखल केले, त्याप्रमाणे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातील संबंधित अधिका-यांना सहआरोपी करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव यांनी केली आहे.
याप्रकरणी दत्तात्रय भालेराव यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, किवळे येथील सर्व्हिस रोडवरील अनधिकृत होर्डिंग कोसळून हकनाक पाच जणांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी असून त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. या घटनेला महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिका-यांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.
सदरील होर्डिंग हे अनधिकृत होते. त्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले नाही. जाहिरात होर्डिंगला परवानगी दिलेली नसताना देखील ते होर्डिग्ज कोणाच्या आर्शिवादाने उभारण्यात आले. संबंधितांनी परवानगी एका नावाने मागितली आणि त्या होर्डिग्जचा चालक दूसराच व्यक्ती आढळत आहे. परवानगीच्या प्रस्ताव याप्रमाणे 40 बाय 20 मागितली होती, मात्र, ते होर्डिंग 42 बाय 42 असं उभारले गेलेले आहे.
महापालिकेने अनाधिकृत होर्डिंगबाबत कारवाई करताना राजकीय व्यक्तींच्या निकटवर्तीयांना अभय दिल्याचे दिसत आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त निलेश देशमुख, कार्यालयीन अधिक्षक तुकाराम जाधव, परवाना निरीक्षक सुभाष मळेकर यांनी ते होर्डिग्ज पाडलेले नाही. कदाचित हे होर्डिग्ज पाडले असते तर त्या निष्पाप व्यक्तीचा जीव आज वाचला असता. त्यामुळे होर्डिग्ज मालक, जागा मालक, चालक यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानूसार महापालिकेचे तत्कालिन सहायक आयुक्त निलेश देशमुख, कार्यालयीन अधिक्षक तुकाराम जाधव परवाना निरीक्षक सुभाष मळेकर यांना सहआरोपी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
शहरातील 434 अनाधिकृत होर्डींग्सवर तातडीने कारवाई व्हावी, शहरातील होर्डिग्जचे फेरसर्वेक्षण करावे, सर्व जाहिरातीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे. मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना कुटुंबांना महापालिकेने दहा लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी. तर जखमींच्या उपचाराचा खर्च मनपाने करावा.
याबाबत योग्य ती दखल घेऊन सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करुन चौकशी करण्यात यावी. दोषी महापालिकेच्या तत्कालिन सहायक आयुक्त, कार्यालयीन अधिक्षक, परवाना निरीक्षक हे देखील तितकेच जबाबदार आहेत. त्या सर्वांनी हलगर्जीपणा केल्याने सदरील घटना घडून निष्पाप पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दत्तात्रय भालेराव यांनी दिला आहे.