लोणावळा (Pclive7.com):- पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर एका केमिकलच्या टॅंकरला अपघातानंतर आग लागली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना लोणावळ्यातील कुणेगाव पुलावर घडली.
अपघातग्रस्त टॅंकर ज्वलनशील केमिकल घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. सकाळी 11.35 वाजताच्या सुमारास कुणेगाव पुलावर पलटी झाला. त्यानंतर टॅंकरने पेट घेतला. या टॅंकरमध्ये तीन जण असल्याचे समजते. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हा टँकर ज्या पुलावर पलटी झाला त्यावेळी पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरून तिघेजण दुचाकीवरून चालले होते. या टॅंकरमधील पेटते केमिकल त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर एक स्त्री गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पुलाखाली आणखी ही दोन ते तीन गाड्या उभ्या होत्या. त्यादेखील जळल्या आहे, मात्र सुदैवाने त्या गाड्यांमध्ये कोणीही नव्हते.
सदर घटनेची माहिती मिळताच आयआरबी, लोणावळा नगरपरिषद, खोपोली नगरपरिषद, आयएनएस शिवाजी यांचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केले. आयएनएस शिवाजीच्या अग्निशमन वाहनातून फोमचा वापर करून साधारण 12.45 वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र दरम्यान या टॅंकरमध्ये दोन ते तीन वेळा स्फोट झाले. हे सर्व सुरू असताना एक्सप्रेस हायवेवर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती.