पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकावेळी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांबाबत संवेदनशीलता दाखवून त्यांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन देण्यात होते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा असा शेतीभाव मिळणे अपेक्षित असतांना शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. डॉ स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ताबडतोब अंमलात आणाव्यात. काँग्रेस-राष्ट्रवादीला या प्रश्नावरून ज्या प्रकारे सत्तेतून पायउतार व्हावे लागले त्याचप्रमाणे युती सरकारला देखील धडा शिकवावा लागेल असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केले.
कदम यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित केलेली कर्जमाफी योजनाही फसवी निघाली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. आता कर्जमाफीच्या लाभासाठी रविवारीही बँक सुरू ठेवण्याचे आदेश काढून सरकारने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न सुरू केलेत.
गेल्या तीन वर्षांत युती सरकारने राज्याला उद्ध्वस्त केले. ‘सामान्यांना हे सरकार आपलेसे वाटत नसल्यानेच कोट्यवधी खर्चून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशी जाहिरात सरकारने केली. बालमृत्यू, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जाहिरातबाजी, स्टंटबाजी हे या सरकारचे तीन वर्षांचे काम आहे.’
कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात १५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यातील ४२ पैकी ३० लाख हेक्टरवरील कापूस बोंडअळीने उद्ध्वस्त केला. पिकाचे नुकसान टाळण्यात कृषी खाते अपयशी ठरले. धान्याचीही हीच स्थिती असून पंचनामे करण्यासही सरकार तयार नव्हते. परंतु, आता अधिवेशनामुळे आदेश काढले. सभागृहात कापूस, धान, सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून देणार असल्याचे नमूद करीत वादळी अधिवेशनाचे संकेत दिले. ‘राज्यात कायदा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून राज्य हत्या, अपहरणात बिहारच्या पुढे गेले आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. बंद केलेली दारूची दुकाने चालू केली आणि चालू असलेली शाळा बंद करीत आहेत होय हे माझ सरकार मीच खरा लाभार्थी म्हणायची वेळ आता सर्व सामान्यावरती आली आहे अशी जहरी टिका सतीश कदम यांनी केली.