भोसरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी आणि पवना नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी ‘कॉमन ॲक्शन प्लॅन’ची गरज असल्याचे सांगत पावसाळी अधिवेशनात सरकारचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे म्हटले आहे. आमदारांचे हे वक्तव्य म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीका शिवसेना नेत्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.
सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे की, पालखी सोहळा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे चित्र आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पवना व इंद्रायणी नदी ह्याठिकाणी नद्यांचे प्रदूषण झालेले असून नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तसेच काही कंपनींकडून थेट नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आलेले असून सदर प्रकारामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. जेणेकरून नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे पाण्यामधील जलचर जीवांना धोका निर्माण झाला आहे. महापालिकेमार्फत नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली नसून काहीही न करता पावसामुळे जलपर्णी वाहून जाईल असे समजून दुर्लक्ष करण्यात आले. सदर कामासाठी कोट्यवधी रुपयांचे बिले निघत असतात परंतु ठेकेदारांकडून ती कामे वेळेत पूर्ण होत नाही. ह्यामधून पालिकेचा बेजबाबदारपणा समोर येत असून सदर बाब अत्यंत गंभीर आहे.
गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असून देखील नदी सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी का होऊ शकली नाही. नदी परिसरात राडारोडा टाकणे हे बंद झाले नाही. MIDC चे एसटीपी प्लांट देखील चालू करू शकले नाहीत. एवढेच नाहीतर मोशी कचरा डेपो इथून सुद्धा घाणेरडे काळे पाणी इंद्रायणी नदी पात्रामध्ये जाते, ह्यावर आतापर्यंत काय उपाययोजना करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस हे इंद्रायणी नदीला भेट देण्यासाठी आले होते तेव्हा ह्यांनीदेखील इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते, ह्याला आता बरीच वर्षे झाली. तसेच आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी देखील इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. स्वतःचे ब्रॅण्डिंग दुसऱ्याच्या पैशांमधून करण्याशिवाय इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आमदारांनी काय केले ते सांगावे? असा सवाल सुरुवात यांनी उपस्थित केला आहे.