देहू (Pclive7.com):- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. हा वैष्णवांचामेळा भक्तीसागराच्या रुपात सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. सकाळ पासुन ढगाळ हवामान व अधुन मधुन येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी आनंदाने अंगावर घेत अत्यंत उत्साही आणि प्रसन्न भक्तीमय वातावरण जलाभिषेक करीत वैष्णवांचे दैवत असलेल्या पांडूरंगाच्या भेटीला जाण्यासाठी तुतारी, टाळ मृदंगाच्या निनाद, विण्याचा झंकार करीत वारकऱी मुक्तपणे ध्येयभान हरखून विविध पाऊलांसह फुगड्या खेळत आनंद व्यक्त करीत होते.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे लाखो भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी दुपारी खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, आमदार शेळके यांच्या पत्नी व जेष्ठ वारकरी व पंढरीनाथ महाराज तावरे यांच्या हस्ते झाली.
आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका आणि महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘‘ज्ञानोबा- तुकाराम’’ हा जयघोष करीत हा पालखी सोहळा लाखो भाविकांचा भक्तीचा महासागर पंढरीच्या वाटेला लागला. चोपदाराचा दंड आणि शिंगाड्याच्या आवाज होताच साऱ्या आसमंतांत मृदंग, टाळ,विणा यांच्या निनाद गुजला आणि सार देऊळवाडा परिसर दमाणून गेला होता. या वातावरणात पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाली.