पिंपरी (Pclive7.com):- आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अजूनही खऱ्या अर्थाने वंचित असलेला महाराष्ट्रातील मातंग समाजाचे पुनरुत्थान करण्याचे शिव धनुष्य खऱ्या अर्थाने कोणी लिलया उचलले असेल तर ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी, नुकतीच त्यांनी बार्टीच्या धर्तीवर आरटी सारखी संस्था आणून मातंग समाजाच्या पुढील पिढीच्या शिक्षणासाठीची दारे खुली करून दिली असल्याचे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले आहे.
अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, याआधी अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचाराने जर्जर झालेले होते, ते सुव्यवस्थित करण्यासाठी महामंडळ पुनर्जीवित करून चांगल्या पद्धतीने त्या महामंडळाला निधी देऊन महामंडळाला उभारी आणण्याचे कामही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊ साठे यांच्या स्टॅम्प तिकिटाचे अनावरणही देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. त्याचबरोबर सातासमुद्रापार जाऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये आपल्या साहित्याची मुहूर्तमेढ रोवली त्या मॉस्को या ठिकाणी जाऊन देवेंद्रजी फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरणही केलं.
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला माहीत असताना मातंग समाजाची प्रेरणा असलेले लहुजी वस्ताद यांचे स्मारक अनेक वर्ष काम खंडित असताना संगमवाडी येथे पाच एकर जमीन हस्तांतरित करून त्याला योग्य बजेट देऊन त्या ठिकाणी भव्य स्मारकाबरोबर शैक्षणिक संकुल निर्माण करण्यासाठी भूमिपूजन देवेंद्र फडणवीस व या सरकारने पूर्ण केले. येणाऱ्या काळामध्ये चेंबूर येथील चिरागनगर येथील अण्णाभाऊ साठेंचे स्मारक लवकरच करू ही घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे, लहुजींचे स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आणून लहुजींच्या स्मारकाचे उद्घाटन लवकर करू असंही त्यांनी खात्रीने सांगितले आहे.
‘अ, ब, क, ड’वर्गवारी साठी समिती बनवून अभ्यास गट तयार करून त्याविषयीचा मार्गही शोधून काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मातंग समाजाच्या वेदना खऱ्या अर्थाने संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी आज तागायत अत्यंत चांगल्या पद्धतीने केल आहे. त्यामुळे आम्हा सगळ्या समाज बांधवांना देवेंद्र फडणवीस हे आमच्याच समाजातील नेतृत्व आहेत असेच आम्हाला जाणवत आहे. एवढ्या तडफेने समाजासाठी काम करणारा व खऱ्या अर्थाने मातंग समाजाचे पुनरुत्थान करणारा लोहपुरुष नेता म्हणून देवेंद्रजींना आम्ही सलाम करतो असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.