महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ‘या’ दिवशी होणार मतदान..!
पिंपरी (Pclive7.com):- देशात १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार असून १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे ला मतदान होणार आहे. तसेच ४ जूनला सर्व मतमोजणी होणार असून या निवडणुकीचा निकाल लागणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील मतदार संघात मतदानाच्या तारखा..
# पहिला टप्पा – १९ एप्रिल – गडचिरोली, भंडारा गोंदिया, नागपूर, रामटेक चंद्रपूर.
# दुसरा टप्पा – २६ एप्रिल – वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
# तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, माढा.
# चौथा टप्पा – १३ मे – नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड,
# पाचवा टप्पा – २० मे – कल्याण, ठाणे, मुंबईतील सर्व सहा मतदार संघ.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ५४३ जागांसाठी लोकसभा मतदान होणार आहे. ही लोकसभा निवडणुक सात टप्प्यात होणार आहे. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. देशात ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. १.८२ कोटी नवे मतदार आहेत. १८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी मतदार आहेत. ८२ लाख मतदारांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे. १०० वर्षांवरील तब्बल दोन लाख मतदार आहेत. ४८ हजार तृतीयपंथी मतदार आहेत. ४९.७ कोटी पुरुष मतदार तर ४७ कोटी महिला मतदार आहेत. महिला मतदारांचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे.
या निवडणुकीसाठी ५५ लाख पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत. दीड कोटी निवडणूक अधिकारी काम पाहणार आहेत. दोन वर्षापासून या निवडणुकीची तयारी सुरू आहे. गेल्या सव्वा वर्षात ११ निवडणुका झाल्या आहेत. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव, मतदारांनी जास्तीजास्त संख्येने मतदान करावे. निवडणूक प्रक्रियेत हिंसेला कोणतेही स्थान नाही. हिंसा रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना सत्क आदेश देण्यात आले आहेत. हिंसाचार झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. निवडणुकीदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमांवर देखील लक्ष राहणार आहे.
कडक आचारसंहिता..
मुख्य निवडणुक आयुक्त पुढे म्हणाले की, काही राज्यात बळाचा तर काही राज्यात पैशांचा वापर केला जातोय. बळ आणि पैशांचा वापर आम्ही होऊ देणार नाही. दारू, साडी, पैसे आदी वस्तू वाटल्या जाऊ नये यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडिया वर अफवा पसरवणाऱ्या देखील कठोर कारवाई होणार आहे. मतदाराला तक्रारी असल्यास ‘सी-व्हिजील’ या वेबसाईटवर तक्रार करता येणार आहे.
उमेदवाराने प्रचारात कुणावरही वैयक्तिक टीका करू नयेत. आरोपांचा, भाषेचा स्तर घसरल्यास कारवाई होणार आहे. मतदारांना प्रलोभने दाखविल्यास कारवाई होणार. राजकीय पक्षांना नियमावली देणार आहेत. लहान मुलांना प्रचारात मनाई आहे. लहान मुलांचा प्रचारात वापर केल्यास कडक कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.