पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीला सर्वस्वी महापालिका जबाबदार आहे. या कचरा डेपोकडे केवळ पैसा कमविण्याच्या दृष्टीने बघितले जाते. मोशी, डुडूळगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य या डेपोमुळे धोक्या आले आहे. सत्ताधारी भाजपला याचे काही देणेघेणं नाही. केवळ पैसा कमवणे एवढचं यांचे ध्येय आहे. घाईघाईत आता वेस्ट टू एनर्जीच्या पाठीमागे लागलेत, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकल्प यशस्वीच होऊ शकत नसल्याचे मत शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला काल रात्री आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. २४ तास उलटले तरीही आग आटोक्यात आलेली नाही. आज शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट तसेच पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आढळराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील कचरा जिरवण्याचे नियोजन चुकले आहे. मर्यादेपेक्षा जास्त कचरा एकाच ठिकाणी गोळा केला जातोय. महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांना याच्याशी काहीही देणेघेणे पडलेले नाही. मोशी कचरा डेपोकडे पैसा कमविण्याच्या दृष्टीने बघितले जाते. भारतात तोड नाही असा भ्रष्टाचार भाजप पदाधिकारी महापालिकेत करत आहेत. भ्रष्टाचारात पीएचडी झालेली मंडळी यांच्याकडे आहेत.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे टेंडर घाईत काढले आहे. यात महापालिकेने कुठलाही पुढचा मागचा विचार केलेला नाही. बेळगाव, राजकोट, पुणे यासह अनेक ठिकाणी हा प्रकल्प अयशस्वी ठरलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकल्प यशस्वी होऊच शकत नाही. यावर मोठ्या प्रमाणात पैशांचा अपव्यय होणार आहे. हे म्हणजे असे प्रयोग करायचे आणि पैसे कमवायचे एवढेच सत्ताधार्यांचे काम आहे. यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे मोशी, डुडूळगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोपही खासदार आढळराव पाटील यांनी यावेळी केला.