पिंपरी (Pclive7.com):- मागील लोकसभा निवडणूकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने देशातील नागरीक अद्याप विसरले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या खासदारांना विसर पडला असला तरी भाजपची सर्व आश्वासने जनतेच्या लक्षात आहेत. शनिवारी पिंपरीत खासदार अमर साबळे यांनी ‘मोदींनी प्रत्येक नागरीकांच्या खात्यात १५ लाख देऊ असे आश्वासन दिले नव्हते’ असे वक्तव्य करुन मोदी अन् शहा यांनाच खोटे ठरविले असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.
याबाबत साठे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, पंतप्रधान मोदींचे १५ लाखांबाबतचे आश्वासन व्हिडीओसह सोशल मिडीयात अद्यापही उपलब्ध आहे. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपा सरकारने चार वर्षात एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. त्यामुळे पत्रकारांनी साबळे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांबाबत प्रश्न विचारले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मोदींच्या आश्वासनांबाबत प्रश्न विचारल्यावर तो ‘चुनावी जूमला’ होता असे उत्तर देतात. तर पिंपरीत त्यांचेच खासदार अमर साबळे हे मोदींसह शहांना देखील खोटे ठरवत दिशाभूल करणारे उत्तर देतात. असे साबळे यांच्या कालच्या वक्तव्यातून दिसते.
केंद्रातील भाजपाचे हे सरकार त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करणार नाही. उलट पत्रकारांना व जनतेलाच खोटे ठरवतील. मोदींची प्रतिमा जगभर ‘फसवा पंतप्रधान’ म्हणून तयार झाली असताना त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अशी वक्तव्य करुन त्याला दुजोरा देत आहे. अशा पंतप्रधानांना आणि भाजपाला पुढील वर्षात होणा-या लोकसभा निवडणूकीत मतदार राजा घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.