पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच गटप्रमुख ही संकल्पना निवडणूक यंत्रणेत पहिल्यांदा आणली. गटप्रमुखांच्या ताकदीवरच मुंबईतील निवडणुका सातत्याने जिंकल्या. गटप्रमुखांचे महत्त्व आता इतर पक्षांना उमगले असून ते आता बुथप्रमुख नावाने आपलीच संकल्पना राबवित आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकाविण्यासाठी गटप्रमुखांना ताकद द्या, निवडणूक जिंकण्याचे तंत्र समजावून घ्या, असे आवाहन शिवसेना नेते, पुणे विभागीय संपर्वâनेते, खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेनेने कधीही कोणाचा द्वेष करत राजकारण केले नाही. मात्र, काही पक्षांनी आपल्या दिलदारीचा गैरफायदा घेतला. गद्दारी, बेईमानी केली. आता त्यांना ’जशास तसे’ उत्तर देण्याची, आक्रमकपणे पुढे जाण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडले. त्यावेळी उद्घाटक म्हणून खासदार संजय राऊत बोलत होते. शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे,आमदार मनोहर भोईर, आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे – पाटील, पिंपरी – चिंचवड – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बाळा कदम, सल्लागार बबनदादा पाटील, सहसंपर्कप्रमुख धनंजय जाधव, वैभव थोरात, नरेश लहाळकर, रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय पाटील, उपजिलहाप्रमुख शिरीष घरत, महेंद्र थोरवे, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शहरप्रमुख योगेश बाबर, सुनील हगवणे, सुनील इंगुळकर, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक रेखा ठाकरे, शहरसंघटक सुलभा उबाळे, शहरसंघटक शादान चौधरी आदी उपस्थित होते. सलग चार वर्षे ’ससंदरत्न’ पुरस्कार मिळविल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत म्हणाले, जनतेच्या कल्याणासाठी आपल्याला पदे मिळाली आहेत. त्याच कारणासाठी त्यांचा वापर झाला पाहिजे. सत्ता आली की ऊतू नका, मातू नका आणि पराभव झाला की निराश होऊ नका, अशी शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दिली आहे. सत्ता आल्यावर हवेत न जाता जमिनीवर राहुनच काम करायला पाहिजे, हेच शिवसेनेचे धोरण आहे.
शिवसेनेत कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यामुळेच अठरापगड जातीचे, धर्माचे लोक एक कुटुंब म्हणून शिवसेनेत गुण्यागोविंदयाने राहतात. एकत्रित कुटुंबात लहानसहान कुरबुरी असतात, मतभेद असतात. त्याचप्रमाणे आपल्यातही कुरबुरी असतील.मात्र, आता एकोप्याने शत्रुशी मुकाबला करायचा आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी गेली चार वर्षे सातत्याने संघर्ष केला, स्वाभिमानाने लढाई केली. त्याची जाणीव ठेवण्याची, त्यांच्या संघर्षाला मानवंदना देण्याची योग्य वेळ जवळ आली आहे.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसणार्यांचे आव्हान आपल्यासमोर आहे. युती होवो अथवा न होवो आपल्याला शिवसेनेच्या ताकदीवर शिवशाही आणायची आहे. युतीबाबत संभ्रम निर्माण केला जाईल, आपल्याला गाफील ठेवले जाईल. मात्र,त्याला न घाबरता आपण ’एकला चलो’च्या भूमिकेतून काम केले पाहिजे. फसव्या, ढोंगी लोकांच्या दिशाभूलीकडे कानाडोळा करा. कोणत्याही भ्रमात न राहता, आपल्याला एकट्याने लढायचे आहे, या मानसिकतेतुन पुढील वाटचाल करा. जशास तसे उत्तर देण्यासाठी आक्रमक व्हा, असेही ते म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या विविधता असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षात अनेक विकास कामे केली. आदीवासी पाड्यांपासून ते ग्रामीण भाग, शहरी भागात विकासाची गंगा नेली. शिवप्रकाश योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागात वीज पोहोचविली. पासपोर्ट कार्यालय सुरु केले. धरणातून गाळ काढण्याचे काम सलग तीन वर्षे केले. रस्तेविकास, वीज, पाणीपुरवठा योजनांना सर्वोच्च प्राधान्य दिले. अनेक लोकाभिमुख कार्यक्रम राबविले. जनआंदोलने करत लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या असून शिवसैनिकांना सज्ज, दक्ष होण्याची वेळ आली आहे.