पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विषमतेची पाळेमुळे घट्ट रुजलेली होती. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासू दूरदृष्टीतुन निर्माण झालेल्या संविधानामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे हे संविधान आधुनिक भारताच्या निर्मितीचा दस्तावेज आणि पवित्र गंथ आहे, अशी भूमिका राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मांडली आहे.
२६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. याच दिवशी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान मसुदा समितीकडे सुपूर्त केले होते. आणि समितीने हे संविधान संसदेत सादर केले होते.
त्यानिमित्ताने राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संविधान पूजन करण्यात आले. यावेळी महामानव आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेलाही पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार साबळे म्हणाले की, २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस अथक परिश्रम घेऊन जगातील इतर लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा बारीक अभ्यास करून बाबासाहेबांनी जगातील सर्वात मोठ्या संविधानाची निर्मिती केली. आणि याच संविधानाच्या आधारावर देशातील लोकशाही अधिक बळकट झाली आहे.
२०१५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या सन्मानार्थ देशाचे कुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. हा खऱ्या अर्थाने या महापुरुषाप्रति असलेला त्यांचा श्रद्धाभाव होता.
आज देशातील युवा पिढीने संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. आज आपण जे व्यक्तीस्वातंत्र्य खऱ्या अर्थाने उपभोगतो आहोत त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी देशाला दिलेले संविधान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले हक्क आणि देशाप्रती व समाजाप्रती असलेली जबाबदारी जाणून घेत त्यानुसार आचरण केले पाहिजे. हाच खरा संविधान दिनाचा उद्देश आहे, असे विचार खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले