पिंपरी (Pclive7.com):- कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु झाल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. पण मजूरी करुन दररोज आपली उपजिविका भागवणारे कष्टकरी कामगार हे घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवण्यासाठी हतबल झाले आहेत. दरम्यान अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमितपणे होणार असला तरी, तो खरेदी करण्यासाठी खिशात पैसे हवेत. कोरोनामुळे कामही बंद आहे. त्यामुळे घरात पैसेच नाहीत, अशी परिस्थिती या कष्टकरी कामगारांची झाली आहे.
कामगारांची ही परिस्थिती पाहून इरफानभाई सय्यद युवा मंचने माणुसकीच्या नात्याने निगडी परिसरातील कष्टकरी, कामगार यांना जीवनावश्यक वस्तू ज्यात गहु, तांदुळ, तेल, मिरची, मसाले, साखर, चहापावडर, साबण आदी साहित्याचे एक किट तयार करून या किराणा साहित्याचे वाटप केले. त्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळाला असून, महामारीच्या संकटात इरफान सय्यद यांनी माणुसकीचे दर्शन घडविले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
इरफान सय्यद म्हणाले की, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद खावा लागत आहे. कष्टकरी नागरिकांची तऱ्हा या पेक्षा वाईट आहे. घरातील राशन संपल्यामुळे या कामगारांवर उसने पैसे मागण्याची वेळ आली आहे. परंतु, अशा स्थितीत एकमेकांच्या मदतीला तरी कोण येणार. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने या कष्टकरी कामगारांमध्ये अन्नधान्याचे वाटप केले.
इरफानभाई सय्यद युवा मंचचे अरुण जोगदंड, तेजस भंडारी, अहिमद शेख, विशाल कांबळे, रवी वंजारी, रामा चिंताले, हैदर शेख, लक्ष्मण वैरागे आदींनी याकामी परिश्रम घेतले.