पिंपरी (Pclive7.com):- आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदान टाळण्यासाठी मतदार यादीतील स्थलांतरित, दुबार, मयत तसेच बोगस नावे वगळण्यात यावीत. राज्याची अद्ययावत मतदार यादी तयार करावी अशी मागणी नगरसेवक संदिप वाघेरे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
संदिप वाघेरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजले आहे. राज्यामध्ये विविध पक्ष व कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये मतदार यादीत नाव आहे परंतु राहत्या पत्त्यावर न आढळून येणाऱ्या मतदारांबरोबरच ज्यांनी स्थलांतर केले व मयत झालेत. अशा मतदारांचा घरोघरी जाऊन शोध घेऊन त्यांच्या नावापुढे शिक्का मारून मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना निवडणूक आयोगामार्फत त्वरित दिल्या गेल्या पाहिजेत.यामुळे एकीकडे यादीतून मतदारांची नावे वगळली जातील, तर दुसरीकडे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या या निर्णयामुळे बोगस मतदान टाळणे शक्य होणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या मतदार पुनरपरीक्षण मोहिमेत पत्त्यावर न आढळून आलेल्या लाखो मतदारांची नावे आढळून आल्याचा अंदाज आहे. स्थलांतरित, दुबार वा मयत मतदारांची नावे स्वत:हून कमीकरण्याची विनंती नागरिकांना केली गेली पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार यादीबरोबरच नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांच्या पुरवणी यादीत नाव असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तसेच मतदार यादी अद्यायवत होण्यास मदत होणार आहे. परंतु असे असतानाही बोगस मतदान होऊ नये म्हणून आयोगाने केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचे काम जलद गतीने केले गेले पाहिजे.
केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागनिहाय मतदार याद्यांची फोड करून देण्यात यावी. व हे अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री करतील. त्यात प्रामुख्याने घरी गैरहजर असलेले मतदार, स्थलांतरित झालेले मतदार व मरण पावलेले मतदार अशा प्रकारे त्यांचे वर्गीकरण करण्यात यावे. मतदार यादीवरच मतदाराच्या नावासमोर केंद्रस्तरीय अधिकारी खून करतील. त्यानंतर मूळ मतदार यादीत प्रत्येक मतदारासमोर तसा शिक्का मारण्यात यावा. मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांना तसेच मतदान केंद्र अधिकाऱ्यांना चटकन ते निदर्शनास येऊन स्थलांतरित मतदार मतदानासाठी आला तर त्याची विचारपूस करणे सुलभ होणार आहे. याचबरोबर मयत मतदारांच्या नावापुढे शिक्का असल्याने त्यांच्या नावे बोगस मतदान टाळता येणास मदत होणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील स्थलांतरित, दुबार, मयत तसेच बोगस नावे वगळणेबाबत विचार करून महाराष्ट्र राज्याची अद्ययावत मतदार यादी करण्याच्या सूचना त्वरित द्याव्यात. अशी मागणी संदिप वाघेरे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.