पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेल्या जगताप डेअरी येथील साई चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन आज भाजपाने महापौर माई ढोरे यांच्या हस्ते केले. या पूलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पूलावर राडारोडा तसेच खड्डे अद्यापही बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरींग उघड्यावरच पडलेल्या अवस्थेत आहे. अशा परीस्थितीमध्ये घाईघाईने केवळ श्रेय लाटण्यासाठीच हे उद्घाटन केले आहे. येथे एखाद्या दुचाकीस्वाराचा अपघात होऊन वित्त किंवा जिवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? राहणार असा सवाल उपस्थित करत महापौरांनी राजशिष्टाचार न पाळता ‘राजकीय व्देषापोटी’ हे उद्घाटन केले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.
नाना काटे यांनी यासंदर्भात महापौर माई ढोरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आज दि.९ रोजी जगताप डेअरी चौकातील पुलाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते काही नगरसदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वस्तुत: सदरचा पुल प्राधिकरणाचा असल्यामुळे प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन या पुलाचे उद्धघाटन ठेवला पाहिजे होते. तसेच महापालिकेच्या विकास कामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटन करावयाचे असेल तर ते राजशिष्टाचाराप्रमाणे महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच विविध पक्षाचे गटनेते व प्रशासन यांच्याबरोबर मिटींग घेऊन चर्चा करुन सर्वानुमते दिनांक, वेळ व उद्घाटन कोणाच्या हस्ते करावयाचे याबाबत सर्व पक्षीय निर्णय होऊन त्याप्रमाणे निमंत्रण पत्रिका छापून त्या कार्यक्रमास पूर्व प्रसिध्दी दिली जाते. परंतु आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंबधी साधा निरोपही दिला गेला नाही. तसेच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनासुध्दा याबाबत कळविले नाही. त्यामुळे प्राधिकरणाचे अधिकारी देखील या उद्घाटनास हजर नव्हते.
या पुलाच्या उद्घाटनाबाबत आम्ही यापूर्वीच म्हणजे दिनांक १०/०२/२०२० रोजी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन या पुलाचे काम पूर्ण झाले असल्यास उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सदर पुलाचे काम अजून थोडे फार बाकी असल्यामुळे ते पूर्ण केल्यानंतर लगेचच पालकमंत्र्याची वेळ घेऊन सदरचे पुलाचे उद्घाटन तातडीने करण्यात येईल असे सांगितले होते.
परंतु केवळ राजकीय व्देषापोटी आपण कोणताही राजशिष्टाचार न पाळता पालिकेच्या कोणत्याही गटनेत्यांना तसेच प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना न देता घाईघाईने पुलाचे उद्घाघाटन केलेले आहे. मागील तीन वर्षापासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ घाई करुन मनपाचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे स्थापत्यांच्या सुमारे ३०० निविदा रद्द कराव्या लागल्या आहेत. कचरा संकलनाची निविदाही दोन तीन वेळा रद्द करावी लागली आहे. तसेच आता परवा येस बँकेत महापालिकेचे सुमारे ९८४ कोटी रुपये अडकले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जानेवारीतच पत्र देऊन सदरची रक्कम काढून घेण्याबाबत बजावले होते परंतु त्याचा कुठलाही परीणाम ना भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर झाला ना प्रशासनावर त्यामुळे मागील तीन वर्षापासून नुसत्या घाईघाईने निर्णय घेऊन ते निर्णय चुकीचे ठरल्यानंतर तोंडावर पडण्याची पाळी येत आहे.
परंतु यातून काहीही बोध न घेता भाजप परत त्याच त्याच चुका करीत आहे. आताही तोच प्रकार झालेला आहे. जगताप डेअरी चौकातील पुलाचे काम अद्याप बाकी आहे. त्या पुलावर राडारोडा तसेच खड्डे बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरींग उघड्यावरच आहे. अशा परीस्थितीमध्ये घाईघाईने उद्घाटन करुन सदरचा पुल वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. यामध्ये एखाद्या दुचाकीस्वाराचा अपघात होऊन वित्त व जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? राहील. केवळ श्रेय घेण्यासाठी हा सर्व घाट घालण्यात आलेला आहे. सदरचे उद्घाटन भाजपच्या एखाद्या नगरसेवकाने केले असते तर तो प्रसिध्दीचा भाग म्हणून पाहिले असते. परंतु शहराच्या प्रथम नागरीकांनी कोणताही विधिनिषेध अथवा राजशिष्टाचार न पाळता राजकीय व्देषापोटी या पुलाचे उद्घाटन करणे अत्यंत चुकीचे आहे. येथून पुढील महापालिकेच्या कोणत्याही विकासकामांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन घेण्याकरीता महापालिकेतील सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. राजशिष्टाचाराचे पालन करण्यात यावे असे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी म्हटले आहे.