पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रात असंघटीत क्षेत्रातील अनेक कामगार आहेत. ज्याचे हातावर पोट आहे. बांधकाम कामगार हा असाच हातावर पोट असणारा कामगार आहे. लाॅकडाऊन मुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात सरसकट १० हजार रूपये जमा करण्याची मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, खेड ,आळंदी, भोसरी विधानसभा मतदार संघाचे सहसंपर्कप्रमुख कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्य सरकार केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत सरकारने नोंदणीकृत १२ लाख कामगारांना दोन टप्प्यात ५ हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या संकटकाळी सर्व कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री व कामगार राज्यमंत्री यांचे इरफान सय्यद यांनी मानले आभार मानले आहेत.
कोरोनामुळे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे बांधकाम, माथाडी, मापाडी, हमाल श्रमजीवी व असंरक्षित कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत येणारे हजारो कामगार रोजगाराअभावी घरातच उपाशी मरत आहे. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक या कामगारांचा विचार करून किमान दोन वेळच्या जेवणासाठी या कामगारांच्या खात्यावर विशेष अनुदान म्हणून सरसकट दहा हजार रुपये एवढी रक्कम जमा करावी, अशी मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीही अधिकृत दुजोरा दिला होता. या मागणीची राज्य शासनाने दखल घेतली आहे. महाविकास आघाडी सरकार समोरील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ लाख नोंदणीकृत कामगारांना दहा नव्हे तर, दोन टप्प्यात पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे शासनाने कामगार नेते इरफान सय्यद यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून, राज्यातील कामगारांना धीर दिला आहे.