– गोविंद अ. वाकडे
(जनसामान्यांचा कौल न घेताच अधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली करून त्यांची प्रतिमा मलिन करणारे राजकारणी कधीच धुतल्या तांदळाचे नसतात.. मात्र अर्ध्या हळकुंडात पिवळे होणा-या अधिकाऱ्यांची संख्याही वाढते आहेच..)
पिंपरी चिंचवड शहर आणि पोलीस आयुक्तालयाला लाभलेले आयुक्त संदीप बिष्णोई यांची नुकतीच बदली केली गेलीय. पिंपरी चिंचवड सारख्या “उद्योगी” शहरात एखादा अधिकारी येतो कधी आणि जातो कधी याचा विचार ना नागरिक करतात, ना नागरी संघटना. राहिला प्रश्न शहर चालविणाऱ्या (हाकणा-यां) लोकप्रतिनिधींचा ते तर अधिकारी रुजू होण्याआधीच त्यांची बॅनरबाजी करून अधिका-यावर आपला शिक्का मारतात आणि पिंपरीतील काहीजण तर असेही आहेत की ज्यांनी थेट पोलीस स्टेशन खरेदी केल्याच्या आविर्भावात पोलीस स्टेशनच्या दारावरच आपल्या नावाची पाटी उभारलीय मात्र कदाचित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकाच नाण्याच्या बाजू असल्यागत पिंपरीकर त्याकडे दुर्लक्ष करतात कदाचित अधिकाऱ्यांनाही जनतेपेक्षा “सरकार”चे सेवक असल्याच दाखविण्यात धन्यता असेल असही म्हणता येईल.
असो….
तर मी म्हणत होतो की 11 महिने आणि दोनच दिवसात पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली केली गेली, या 11 महिन्यात बिष्णोई ह्यांनी काय केलं तर त्यांनी शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवला, आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणं करून दिली आणि पोलीस दलाच्या शिस्तीचा सन्मान वाढवत 5,000 हुन अधिक पेंडिंग केसेस निकाली काढल्या. कोणतीही घटना असो तिथे वरिष्ठ अधिकारी जायलाच हवा, गुन्हा कोणताही असो त्याचा तपास कुठंवर आला त्याचा अहवाल दर दिवसाआड सादर व्हायलाच हवा आणि कर्मचारी असो की अधिकारी असो त्यांनी स्वतः कर्तव्य बजावतांना कुचराई करता कामा नये असा खाक्या असल्याने त्यांच्या कामाचा आलेख थक्क करणारा आणि कर्मचारी अधिका-यांचं मॉरल वाढविणाराही ठरला होता. किंबहुना म्हणूनच तर त्यांच्या काळात राज्यातील सर्वात मोठा शस्त्रसाठा जप्त केल्या गेला आणि बेकायदेशीर शस्त्रविक्री करणारं आंतरराज्यीय रॅकेट उध्वस्त करण्यात पिंपरी पोलीस दलाला यश आलं. तर अनेक संवेदसनशील प्रकरणही पोलिसांनी व्यवस्थित हाताळले..
मग माशी शिंकली कुठे…
बिष्णोई यांच्या पिंपरीतील कारकिर्दीने तसा वेग पकडलाच होता, मात्र 23 वर्षांपासून त्यांच्या पाठी असलेल्या “पठाणी”बाण्याचं “कुबड” तब्बल 60 % वर आलं आणि त्यांचा कारभा”चा-कण न कण बोलू लागला,त्यातच “आसवानी” ओतप्रोत भरलेल्यानी 1 जुलैला त्यांच्या बदलीचा विडा उचलला त्यात भर म्हणून त्यांनी हिंजवडी ते चाकण “भु -क्षेत्रात” राबविलेल्या “कल्याण”करी योजनाही त्यांच्याच अंगलट आल्यामुळे त्यांचा आतला आणि बाहेरचा “सु-धीर”खचला आणि महिन्या संपण्याच्या आतच पंचतारांकित कारभाऱ्यांनी मिळून त्यांचं बदली प्रकरण “धसास” लावलं..मात्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणारे इतर लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प होते, याचचं अर्थ असा होतो की जेव्हा राजकारणी ठरवतात तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या पदरात अधिकारा ऐवजी धिक्कारच पडतो… पण “पठाणी बाणा” बाळगणाऱ्या अधिका-यांच्या बदलीचा घटनाक्रम असाच असतो हेही समजून घ्या.
मग तुम्ही म्हणाल झालं ते ठीकच झालं पण ते तसही नसतं हो विषय आहे शहराच्या अस्मितेचा, प्रतिमेचा आणि कारभाराचा.. कारण अचानक बदलून गेलेले अधिकारी मग पुन्हा शहराकडे फिरकत नाहीत आणि तेव्हा शहराचं होणारं नुकसान कधीही न भरून निघणारं असतं अर्थात त्या नुकसानाची झळ नकळतपणे शहरवासीयांनाच भोगावी लागते, कारण अशा बदल्या होणं त्या शहरातील सुजाण नागरिकांनी आपली बुद्धी गहाण ठेवल्याचे प्रतीक असतात..
आधी आर.के.पद्मनाभन, त्या नंतर संदीप बिष्णोई या दोन्ही पोलीस आयुक्तांची मुदतपूर्व बदली केली गेली दोन्हीही वेळेस शहरतील नागरिक गप्पच राहिले, तिकडे पोलीस दलातील अधिकारी /कर्मचारी बदलीला विरोध करण्याची सुतरामही शक्यता नसते आणि हे अशा लोकांमुळे होते जे लोकं अशा अधिकाऱ्यांना जनतेची सेवा सोडून आपल्या सेवेसाठी वापरण्याचं स्वप्न बघतात ते ना जनतेचे पाठीराखे असतात ना अधिकाऱ्यांचे “अर्ध्या हळकुंडात पिवळे होणाऱ्या प्रत्येकांनी या वस्तुस्थितीवर “प्रकाश” टाकायला हवा एव्हढचं…