मुंबई (Pclive7.com):- करोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राजकीय आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर सीबीआयनं मुंबईत ठिकठिकाणी छापासत्र सुरू केलं आहे.
अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरन हत्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक (निलंबित) सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारनं पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्यावर ठपका ठेवून त्यांचीही या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.
त्यानंतर परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते, असे सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. त्या संबंधीच्या व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावेही त्यांनी दिले होते. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
हे प्रकरण पुढं उच्च न्यायालयात गेलं. देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी विनंती अॅड. जयश्री पाटील यांनी एका जनहित याचिकेद्वारे न्यायालयाला केली होती. न्यायालयानं ती मान्य करून सीबीआयकडे हे प्रकरण सोपवले होते. मागील काही दिवसांच्या तपासानंतर आता सीबीआयनं या प्रकरणात कारवाईचं पहिलं पाऊल उचललं आहे. गुन्हा दाखल करतानाच सीबीआयनं देशमुख यांच्या घरासह अन्य दहा ठिकाणी छापे टाकून झाडाझडती सुरू केल्याचं समजतं.