पिंपरी (Pclive7.com):- मार्च 2019 पासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे अनेकदा पुर्णता: अंशता लॉकडाऊन करण्यात आले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या महामारीवर नियंत्रण मिळवणे आणखी त्रासदायक झाले आहे. लॉकडाऊनमुळे औद्योगिक, आर्थिक, शेती, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांवर प्रतीकूल परिणाम झाला आहे. मागील दिड वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद होती.
सोमवार 4 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील माध्यमिक शाळा व महाविद्यालय सुरु करण्यात आली आहेत. अजून कोरोना पुर्ण नियंत्रणात नाही. त्यामुळे शाळेत येणा-या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी, कर्मचारी वर्गांनी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनीच मास्क वापरावे, सुरक्षित अंतर पाळावे व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम यांनी केले.
माझा प्रभाग माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते पिंपरीतील एच. ए. हायस्कूलमध्ये आणि खराळवाडी मधिल मनपाच्या माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांना व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना मोफत वॉशेबल पाच मास्क आणि एक सॅनिटायझरची बाटलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी कोरोनावर नियंत्रण मिळविण्याबाबत जनजागृती करणारे पत्रक वाटप करण्यात आले.
यावेळी एच. ए. हायस्कूलचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे, मनपा खराळवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड आदी उपस्थित होते.