पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब निगडीतर्फे डॉ.अमोल वाघमारे आणि सलोखा संपर्क गट यांना रोटरी शांती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220422-WA0004-300x300.jpg)
रोटरी क्लबचे अध्यक्ष जगमोहन भुर्जी म्हणाले की, डॉ.अमोल वाघमारे हे आदिवासी समाजात मुख्यत्वे काम करतात. आंबेगाव या गावातील फलूदे आणि परिसर यामध्ये त्यांनी प्रौढ साक्षरता वर्ग, पाणलोट क्षेत्र विषयक कामे, सामूहिक विवाह सोहळे, श्रमदानातून जलसंधारण असे कार्य केले आहे. तसेच जागोजागी ग्रंथालय स्थापन करणे, रोजगार मिळवून देणे हे त्यांचे कार्य सतत चालू आहे.
डॉ. वाघमारे म्हणाले कि, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्या समाजाची सर्वांगीण प्रगती करण्याचे त्यांचे हे रचनात्मक कार्य समाजात शांतता प्रस्थापित करण्यास मदत करत आहे.
रोटरी क्लब निगडीचे सचिव सुहास ढमाले म्हणाले की, सलोखा संपर्क गट हा समाजात धार्मिक, सामाजिक सलोखा टिकावा, जातीय धार्मिक ताण-तणाव दूर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. सलोखा गटाचे समन्वयक डॉ. मोहन देस यांनी सलोखाच्या कार्याची जनजागृतीसाठी माहिती दिली. सलोखा शिबिर, सलोखा दिंडी, वारी प्रेमाची, भेटीगाठी, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत.
सलोखा संपर्क गटाने विविध धर्मस्थळा, कौसर बाग मस्जिद, पंचवटी मिशन चर्च, सिटी चर्च, रविवार पेठेतील ज्यू सिनेगॉग, गुरुद्वारा इत्यादी ठिकाणी भेट देऊन अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या समजावून घेतलेल्या आहेत. समाजात शांतता नांदावी यासाठी त्यांचे प्रयत्न अखंड चालू राहील असे आश्वासन दिले. या कार्यक्रमात सन्मानपत्रचे वाचन अलका करकरे आणि सुजाता धमाले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शुभांगी कोठारी आणि आभार प्रदर्शन केशव मानगे यांनी केले. या कार्यक्रमास अनेक मान्यवर रोटरी सदस्य उपस्थित होते.