अमरावती (Pclive7.com):- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे आज पंतप्रधान मोदी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते असे म्हटले. आषाढी वारीसाठी सोमवारी (दि.२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.
मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. यामुळे अजित पवार यांना भाषणाची संधी का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती.
या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. “पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम झाला. या ठिकाणी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.