पिंपरी (प्रतिनिधी):- यशवंतराव चव्हाण यांनी सर्वधर्म समभावातून महाराष्ट्र घडविला होता. तोच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आलोत. मात्र आज वातावरण बिघडतयं, असहिष्णुता वाढत असल्याची खंत माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी चिंचवड येथे व्यक्त केली.
कृषी, औद्योगिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना यशवंत-वेणू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. हा पुरस्कार जेष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पी.डी.पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उल्हासदादा पवार, सुदाम मोरे उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, गेली ३ वर्षे हा पुरस्कार मी नाकारत होतो. आता पुरस्कार स्विकारण्याचे वय राहिले नाही. मी प्रामाणिकपणे यशवंतरावांच्या विचाराने काम करत आलोय. त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलयं. त्यांना जवळून पाहण्याची संधी मला लाभली. त्यांनी दलित,बौध्द समाजाला सोबत घेऊन काम केले. माझ्या प्रत्येक संघर्षात मला पत्नीची मोठी साथ मिळाली. यशवंतरावांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा विचार आजही महाराष्ट्रात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मी करतोय. मात्र आता वातावरण बिघडलयं, असहिष्णुता वाढत चालली आहे. सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, सामाजिक समता याचा सगळ्यांनीच पुन्हा एकदा खालपासून वरपर्यंत विचार करण्याची गरज आहे. एवढं सगळं मिळवलेलं कोणीतरी पुसतयं, ते न पुसण्याचे काम करायचे असेल तर तरूणांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
उल्हासदादा पवार म्हणाले की, यशवंत-वेणू पुरस्काराने सुशिलकुमार शिंदेंचा गौरव खरचं अभिमानास्पद आहे. अनेक संकटांवर मात करून खडतर आयुष्यात उत्तुंग प्रवास कसा करायचा याचे जिवंत उदाहरण म्हणजे सुशिलकुमार शिंदे यांची कारकिर्द आदर्श आहे. शिंदेंचा जिवनप्रवास आजच्या तरूणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
यावेळी नगरसेवक अमित गावडे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, विजय जाधव यांना यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ पुरस्कार, युवा उद्योजक युवराज काटे पाटील यांना यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्काराने गौरविण्यात आले.