लंडन :- भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला मंगळवारी अटक करण्यात आली. लंडनमध्ये विजय मल्ल्याला अटक करण्यात आली असून आर्थिक गैरव्यवाहाराप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र मल्ल्याला तात्काळ जामीनही मंजूर झाल्याचे वृत्त आहे.
किंगफिशर उद्योग समुहाचा मालक विजय मल्ल्यावर देशातील विविध बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडवल्याचा आरोप आहे. याप्रकरणात चौकशी सुरु होताच २ मार्च २०१६ रोजी मल्ल्या देशातून पसार झाला होता. जानेवारीत भारतातील न्यायालयाने कर्ज देणाऱ्या संस्थांच्या गटाला थकीत कर्जे वसूल करण्यास सांगितले होते. यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मल्ल्याला अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून याबाबत भारताने ब्रिटनशी पत्रव्यवहारदेखील केला आहे. यापूर्वी विजय मल्ल्याला १८ एप्रिल रोजी स्कॉटलंड यार्डने अटक केली होती. त्याला वेस्टमिन्स्टर येथील न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात असता तेव्हादेखील त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला होता.
दरम्यान, विजय मल्ल्याने बँकांचा पैसा बोगस कंपन्यांमध्ये गुंतवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मल्ल्याने एसबीआयकडून ६ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. यातील बहुतांश पैसा मल्ल्याने बोगस कंपन्यांकडे गुंतवल्याची माहिती सीबीआय आणि ‘ईडी’च्या तपासातून उघड झाली होती. याप्रकरणात सीबीआय आणि ईडीकडून मल्ल्याविरोधात नवीन आरोपपत्रही केले जाणार आहे.