पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात सत्ताधारी भाजप सपशेल अपयशी ठरली आहे. शहरात कचरा समस्या, दूषित व अनियमित पाणी पुरवठा, साथीच्या आजाराचा वाढलेला प्रादूर्भाव, जुने प्रकल्प रखडले, नवीन विकासकामांचा थांगपता नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी महापालिकेत बैठक घेत प्रशासनाला जाब विचारला. अजितदादांच्या ‘त्या’ बैठकीनंतर भाजप पदाधिकार्यांनी चांगलाच ‘धसका’ घेतला आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सत्ताधार्यांनी आज महापालिकेत विभाग प्रमुखांची तातडीची एकत्रित बैठक घेत झाडाझडती केली.
महापालिकेच्या स्थायी सभागृहात झालेल्या बैठकीला महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हंगे यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या १५ वर्षात राष्ट्रवादीने सत्तेच्या माध्यमातून कायापालट केला. मात्र महापालिका निवडणुकीत मतदारांना राष्ट्रवादीला नाकारले. भाजप अनपेक्षितपणे सत्तेत आली. मात्र गेल्या सहा महिन्यात सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांना अजूनही कामकाजात सूर गवसला नाही. पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ बसत नसल्याने कामकाजात सुसूत्रतता येण्यास दिरंगाई होत आहे. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांना महापालिकेतील अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकदा भाजप पदाधिकारी प्रशासना विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. अधिकारी ऐकत नसल्याने सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी हतबल झाल्याचे उघडपणे सांगतात.
आजच्या या बैठकीबाबत बोलताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, सत्ता बदलली तरी अधिकारी बदलाच्या मनःस्थितीत नाहीत, प्रशासनात कामचुकारपणा, दप्तर दिरंगाई, लोकाभिमुख कामकाजात अडथळा, यासह अनेक कामात वेळ खाऊपणा करु लागले आहेत. यामुळे सहा महिन्यात नागरिकांची तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळेच विभाग प्रमुखांची एकत्रित बैठक घेवून नेमक्या अडचणी काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आता सर्वच विभाग प्रमुखांना कामकाजात बदल घडवून आणण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. प्रबळ इच्छाशक्तीने प्रभावी उपाययोजना, कामकाजात तत्परता, कामात सक्षमता दाखवून नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा द्याव्यात, अशा सूचना केल्या असल्याचे पवार म्हणाले.
दरम्यान, सत्ताधारी भाजपला महापालिका कामकाजाचा सुरू गवसला नसून, अजितदादांच्या ‘त्या’ बैठकीमुळेच खडबडून जागे झालेल्या भाजप पदाधिकार्यांनी आजची तातडीची बैठक घेतली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.