पिंपरी (Pclive7.com):- “वाचनाने माणसाचे आयुष्य समृद्ध होते. पुस्तके माणसाच्या मनावर संस्कार करतात”, असे प्रतिपादन ज्येष्ठ कविवर्य उद्धव कानडे यांनी केले. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विद्यालयाचा ग्रंथालय विभाग, मराठी विभाग व माजी मुख्याध्यापक स्व. माणिकराव गर्जे प्रतिष्ठान पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप कुमार देशमुख, उपप्राचार्य राजेंद्र कोकणे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जाधव, गर्जे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा संपत गर्जे, प्रा. प्रतिभा ढोकरे, बाबासाहेब शिंदे, प्रा. गौरी जाधव, प्रा. शितल भापकर, प्रा. वैभव केसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्धव कानडे पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, “आई-वडिलांबरोबरच ग्रंथ हे मुलांच्या मनावर संस्कार करतात. संस्कार आयुष्यात फार महत्त्वाचे असतात. संस्कार करावे लागत नाही तर ते होत असतात. आई-वडिलांचे प्रथम कर्तव्य आहे की, मुलांना चांगले वागायला शिकवा. चांगले संस्कार होण्यासाठी आई-वडिलांनी मुलांच्या समोर चांगले वागायला पाहिजे. पुस्तक म्हणजे काय?, पुस्तकात माणसाचे जगणं असतं, माणसाचं मन असतं, विविध माणसांच्या अनुभवाचे भांडार म्हणजे पुस्तक असते. हे अनुभवाचे भांडार अभ्यासातून, चिंतनातून, वाचनातून, अनुभवातून आलेले असते. पुस्तक म्हणजे नुसते ग्रंथ नव्हे. ज्या लेखकाने पुस्तक लिहिले त्या लेखकाचे त्या पुस्तकात हृदय असते. हे हृदय वाचक पुस्तक रूपाने वाचत असतो. वाचनाने लेखकाच्या हृदयाशी वाचकाच्या हृदयाचा संवाद होतो. त्या संवादातून आपोआप वाचन प्रेरणा प्राप्त होत असते.” त्याचबरोबर उद्धव कानडे यांनी, ‘हे माणुसकीचे नाते जोडीत मी निघालो, अंधार जरा थोडासा उजळीत मी निघालो’ व ‘आईची आय शिवमाय’ या आपल्या कविता मुलांसमोर सादर करून त्यांना मंत्रमुग्ध केले.
तत्पुर्वी डॉ. एक. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच पुस्तकांचेही पूजन करण्यात आले. प्रास्ताविक पर मनोगतात गर्जे प्रतिष्ठाचे अध्यक्ष प्रा. संपत गर्जे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अनुष्का काकडे या विद्यार्थिनीने ‘वाचनाचे महत्त्व व त्यामुळे होणारे संस्कार’ या विषयावरील आपले भाषण सादर केले. तसेच कु. सृष्टी कांबळे या विद्यार्थिनीने पाठ्यपुस्तकातील एका उताऱ्याचे अभिवाचन केले. अनुष्का काकडे व सृष्टी कांबळे या दोन विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य दिलीप कुमार देशमुख यांनी, माणूस घडविण्यासाठी माणसाचे विचार सुधारले पाहिजेत. पुस्तक वाचनाने माणसाचे विचार व आचार सुधारतात. आचार विचार सुधारले तर अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारताचे स्वप्न साकार होईल असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली बनकर यांनी केले. अतिथी परिचय प्रा. प्रतिभा ढोकरे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन ग्रंथपाल नितीन जाधव यांनी केले.