नवी दिल्ली (Pclive7.com):- दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली असून आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले होते. मात्र दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच निवडणूक आयोगाला यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी शिवसेना या पक्षनावावर व धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. दोन्ही गटांनी सादर केलेल्या लेखी निवेदन व पुराव्याच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला. या हंगामी निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर कोर्टाने आज हा निर्णय दिला आहे.