आळंदी (Pclive7.com : प्रसाद बोराटे):- दुर्गमहर्षी प्रमोद (भाऊ) मांडे यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे ऐतिहासिक वारसा सहलीचे (हेरिटेज वॅाक) आयोजन आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. आळंदी हे एक प्राचीन नगर असून त्रेता युगापासून ही नगरी असल्याचा दावा आळंदी येथील इतिहास अभ्यासक ॲड. नाजिम शेख यांनी केला आहे. त्यांनी युगानुयुगे ही प्राचिन नगरी अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे या हेरिटेज वॅाकच्या दरम्यान सादर केले. कृत युगात आनंदवन या नावाने प्रचलित असलेल्या नगरीचे कालपरत्वे नवनवे नामांकन झाले असून वारून, विपिन, कपिला, सिद्धक्षेत्र, शिवतिर्थ, असद, कणिका, अलकावती, अलंका, अलंकापुरी ते आळंदी असे जवळपास अकरा वेळा हे बदलले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
आजही आळंदीमध्ये अतिप्राचिन असे जलश्रोताचे जवळपास २२ कुंड उपलब्ध असून त्यापैकी १३ कुंडांचा शोध घेण्यात ॲड. नाजिम शेख हे यशस्वी झाले आहेत. त्यापैकी सर्वात प्रथम त्यांनी सध्यस्थितीला स्मशानभूमी असलेल्या जागेपासून २०० फुटांवर असलेल्या कोटी तीर्थाची महती विषद केली. सदरचे कुंड हे नृसिंह सरस्वती यांनी सन १८७६,७७,७८ साली आलेल्या महामारी आणि दुष्काळामध्ये येथे जलस्रोत शोधला. सदरच्या कुंडाची दुरावस्था झालेली असून त्याचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांनी या कुंडाबद्दल माहिती सांगताना सदरच्या कुंडातील पाण्यात काही दुर्मिळ घटक मिळतात ज्यामुळे त्वचारोगांवर इलाज होण्याचे सामर्थ्य आहे असे म्हटले जाते.
नदी तीरावर दुसरे कुंड हे रक्षाविधीसाठी जाण्याच्या रस्त्यावर बांधल्या गेलेल्या सुलभ शौचालयाशेजारी असून या कुंडास समुद्र तीर्थ अथवा मत्स्यतीर्थ असेही म्हटले जाते. याचे प्रमाण देताना त्यांनी सांगितले की आजही जेंव्हा भरती आणि ओहोटीच्या वेळी या कुंडातील पाणी कमी जास्त होत असते. म्हणूनच त्यास समुद्रकुंड म्हटले गेले आहे.
आळंदीच्या घाटावर काही कुंड पहायला मिळतात. ज्यामधे चक्रतीर्थ नावाचे कुंड असून तेथे अस्थी विसर्जित केल्या जातात. या कुंडाचे वैशिष्ट्य सांगताना ॲड. नाजिम शेख यांनी विशेष माहिती दिली की, सदर कुंडात विसर्जित केलेल्या अस्थी येथे पूर्णतः वितळतात. भगवान विष्णू यांनी चक्रासूराचा वध येथे केल्याची अख्यायिका असून चक्रासूराच्या नावाने हे तीर्थ ओळखले जाते.
तिथेच शेजारी आणखी तीन कुंड उपलब्ध असून वरील बाजूस प्रभू श्रीरामाचे मंदिर असल्याने या जलश्रोतास आजमितीस रामकुंड म्हणून संबोधले जाते. परंतू प्राचिन काळी या कुंडास गदातीर्थ नाव असल्याचे संदर्भ मिळतात. बाजूची आणखी दोन कुंड इथे उपलब्ध आहेत. आळंदीच्या प्रशस्त घाटावर आणखी एक कुंड उपलब्ध असून सध्यस्थितीला ते बुजवले गेले असून त्याचा श्रोत बाजूलाच असलेल्या जलाशयात सोडला आहे. असे असले तरी नदीपात्रात उतरलेल्या पायर्यांच्या चिर्यांमधून पाणी सातत्याने झिरपत असते. या कुंडास संध्यातीर्थ म्हणून संबोधले जात असून हिंदू धर्मात सांगितलेल्या रोजनिशीतील होणार्या तीन संध्या (पुजा) साठी येथील पाणी शरीरशुद्धीसाठी वापरले जात असे.
आळंदी येथे भागिरथी, मणिकर्णिका आणि कुबेरगंगा या नद्यांचे उगम आहेत. म्हणून आळंदी हे त्रिवेणी संगम असलेले तीर्थ म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध असलेले नगर होते. ॲड. नाजिम शेख यांनी यानंतर गोपाळपुर्यात असलेल्या भागिरथी नदीपात्रात असलेल्या कुंडाची माहिती सांगितली. सदरचे कुंड नेमके कोणते याबाबत ते अजून अभ्यास करत असून ते बहुदा वायु कुंड की शाली कुंड असावे असे त्यांना वाटते. पुराणात आणि विविध साहित्यकृतीत २२ कुंडांचे उल्लेख मिळत असून त्या पैकी तेरा कुंडांचा शोध घेण्यात यशस्वी झालेल्या ॲड. नाजिम शेख यांना सदर कुंडांचे जतन व्हावे त्यांना पुर्वप्रतिष्ठा मिळावी यासाठी हवे ते प्रयत्न करण्याची त्यांची तयारी आहे.
आळंदी नगरीचा हा अतिप्राचिन परंतू अप्रकाशित आणि दुर्लक्षित वारसा जगापुढे यावा, यावर आवश्यक ते शास्रोक्त संशोधन व्हावे अशी अपेक्षा ते वारंवार व्यक्त करताना दिसतात. ते आवर्जून सांगतात की मी या मातीचा पुत्र आहे आणि या आळंदीच्या मातीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. या माध्यमातून आळंदीची खरी ओळख जगापुढे आणण्यासाठीच मी सदैव प्रयत्नशील आहे. माझ्या मातृभूमीची या माध्यमातून एकार्थाने सेवा करून उपकृत होण्याचा माझा प्रयत्न असेल. आळंदी ही संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतार काळापूर्वीच एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि या नगराचे गतवैभव मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असून या कामी मला आळंदी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सचिन आण्णा गिलबिले यांचे सर्वोतोपरी सहकार्य मिळत आले आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या ऐतिहासिक वारसा सहलीचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी केले. याप्रसंगी जेष्ठ इतिहास अभ्यासक, मोडिलिपी तज्ञ ब.हि.चिंचवडे, इतिहास अभ्यासक निलेश गावडे, इतिहास अभ्यासक संतोष घुले, जितेंद्र आबा माळी, रतनजी इंगवले, मल्हारजी दुधाळ, रविराज फुगे, पत्रकार एम.डी.पाखरे, डी.के.कुऱ्हाडे, श्रीकांत बोरावके, दिनेश कुऱ्हाडे यांच्यासह अविरत श्रमदान संस्थेचे सदस्य, गडकिल्ले सेवा संस्थेचे सदस्य आणि उदयभाऊ गायकवाड युथ फाऊंडेशनचे सदस्य ही मोठ्या संखेने उपस्थित होते. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरातील दर्शनाने या हेरिटेज वॅाकची सांगता झाली.