पिंपरी (प्रतिनिधी):- संपुर्ण उत्तर भारतीय समाजात लोकआस्थेचे महापर्व समजला जाणारा लोकोत्सव संपुर्ण भारतभर आज कार्तिक शुक्ल षष्टीला मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे मोशी इंद्रायणी घाटावर विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपुजेनिमित्त इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरती करण्यात आली. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, माजी उपमहापौर शरद बो-हाडे आदींसह हजारों उत्तर भारतीय बंधू भगिनी उपस्थित होते.
वाराणशी (काशी) येथील गंगेच्या घाटावर ज्याप्रमाणे गंगेची आरती करण्यात येते त्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच मोशीत इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती करण्यात आली. सायंकाळी ६.०५ वाजताच्या सुर्यास्त मुहूर्तावर सुर्यनारायणाला हजारों भक्त भाविकांनी अर्ध्य दिले. सर्व उत्तर भारतीय कुटूंब जल, जमिन आणि जगंलाचे रक्षण संवर्धन व्हावे यासाठी नदी किनारी येऊन वसुधंरे प्रति प्रेम भावनेने समर्पित होऊन दिवाळी नंतर सहाव्या दिवशी सुर्य नारायणाची उपासना, पुजा करुन त्याचे गुणगाण गातात. मानवाच्या जीवनातील निर्सगाचे व नदीचे महत्व लक्षात घेऊन नदी घाटावर श्रध्दापुर्वक पुजा विधी करतात. महिला आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी या दिवशी निर्जला व्रत करुन दुस-या दिवशी पहाटे सुर्योदयावेळी सुर्यनारायणास अर्ध्य देऊन प्रसाद ग्रहण करुन उपवास सोडतात. यावर्षी महोत्सवात इंद्रायणी नदी संवर्धनाचा संकल्प करीत विश्व श्रीराम सेनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उर्त्स्फुतपणे स्वच्छता अभियान राबविले.
कार्यक्रमाच्या आयोजनात शामबाबू गुप्ता, अक्रम शेख, प्रमोद गुप्ता, सुनिल सिंह, संजय विश्वकर्मा, देवेंद्र पासवान, रामेश्वर गौड, फुलचंद राम, उमेश सिंह, राजकुमार गुप्ता, रोहित प्रसाद आदींनी सहभाग घेतला.