पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली. त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही राजकारणाचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे राजकीय व्यक्तीच्या हाती जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यकाल संपलेल्या पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीसाठी लांब राहावे लागणार होते. सत्तारुढ गटाचे सर्वच उमेदवार यामुळे बाहेर जाणार होते. त्यामुळेच सत्तारुढ गटाकडून रोहित पवार यांचे नाव पुढे करण्यात आले होते. अधिकृत घटनेच्या वादात गेली दोन वर्षे अडकलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी रोहित पवार यांना पुढे करण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला.
संघटनेवर खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र क्रिकेट संघटना देखील मागे राहिली. महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही. निवडणूकीपूर्वी पडद्यामागे रंगलेल्या नाट्यात क्रिकेटचा पराभव झाला हेच या निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. निवडणुकीत रोहित पवारांनी एकतर्फी बाजी मारली. शंतनु सुगवेकर आणि घटना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणारे अभिषेक बोके दोघेही रोहित पवारांपासून खूप दूर राहिले.