पिंपरी (Pclive7.com):- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बडतर्फ केल्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेस आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी आज पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आंतररष्ट्रीय पातळीवर भारत हा नेहरू-गांधी यांचा भारत म्हणूनच ओळखला जाणार आहे. तो मोदींचा भारत नसणार आहे. ‘मोदी इज नॉट इंडिया’ अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांची खासदारकी निलंबित करण्यात आली तसेच सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आले. याविरुद्ध कॉंग्रेसने देशभरात पत्रकार परिषद घेऊन ‘जय भारत सत्याग्रह’ अभियान सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांची शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट तसेच श्याम अगरवाल, अशोक मोरे, सायली नढे, नरेंद्र बनसोडे, कौस्तुभ नवले, ॲड. उमेश खंदारे, डॉ. वसीम इनामदार, ज्ञानेश्वर मलशेट्टी, झेवियर ॲन्थनी, मिलिंद फडतरे, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, किरण नढे, आकाश शिंदे, रवि कांबळे, विजय ओव्हाळ, बाबासाहेब बनसोडे, गौतम ओव्हाळ, जॉर्ज मॅथ्यू, जितेंद्र तांब्या, मेहबूब शेख आदी उपस्थित होते.
भाजप नेत्यांकडून महिलांवर होत असलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्यावर जोरदार टीका आमदार शिंदे यांनी केली. त्या म्हणाल्या की, आरएसएसची विचारसरणी महिलांच्या विरोधी आहे. विरोधकांच्या स्त्रियांकडे वेगळ्या पद्धतीने बघा, हाच विचार त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यापर्यंत आला आहे. म्हणूनच त्यांच्याकडून महिलांबाबत वक्तव्य केली जात आहेत असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
काँग्रेसची एक विचारधारा आहे आणि त्या नुसार सावरकरांची भूमिका काँग्रेसला मान्य नाही आणि म्हणूनच त्यांनी त्या बाबत असे वक्तव्य केले असल्याचे सांगतानाच महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचेही त्या म्हणाल्या. भाजप हा मुख्य स्पर्धक आहे आणि सर्व विरोधक एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षे विरोधात जाण्यासाठी ३० दिवस असतात आम्ही या निर्णय विरोधात अपील करू असंही त्या म्हणाल्या.
खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे धाबे दणाणले आहेत. म्हणूनच राहुल गांधी यांना विविध प्रकरणांमध्ये अडकवून त्यांची खासदारकी रद्द करून निलंबनाची कारवाई केली आहे. याविरुद्ध देशातील काँग्रेस पक्ष आणि अन्य विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला आहे. सर्वसामान्य जनता हे सर्व पाहते आहे. आता देशातील नागरिक भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. मागील आठ वर्षांपासून पंतप्रधान मोदींची हिटलरशाही सुरू आहे, अशी टीका देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
या पत्रकार परिषदेनंतर खासदार राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी शहर कॉंग्रेसने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहीमेला प्रतिसाद देत आमदार प्रणिती शिंदे यांनी नाशिक फाटा येथे उपस्थित राहून स्वाक्षरी केली.