पंतप्रधानपदी असताना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करावा लागला होता. तर डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांना ते पंतप्रधान होण्यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुरस्काराचे पूर्वीचे मानकरी
ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना पहिला पुरस्कार प्रदान करून १९८३ मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली. गोदावरी परुळेकर, इंदिरा गांधी (मरणोत्तर), श्रीपाद अमृत डांगे, अच्युतराव पटवर्धन, खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर), सुधाताई जोशी, मधु लिमये, बाळासाहेब देवरस, पांडुरंगशास्त्री आठवले, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, टी. एन. शेषन, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मनमोहन सिंग, डॉ. आर. चिदम्बरम, डॉ. विजय भटकर, राहुल बजाज, प्रा. एम. एस. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन, रामोजी राव, एन. आर. नारायण मूर्ती, सॅम पित्रोदा, जी. माधवन नायर, डॉ. ए. सिवाथानू पिल्लई, मॉन्टेकसिंग अहलुवालिया, प्रणब मुखर्जी, शीला दीक्षित, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे, डॉ. ई. श्रीधरन, डॉ. अविनाश चंदेर, सुबय्या अरुणन, शरद पवार, आचार्य बाळकृष्ण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचूक, डॉ. सायरस पूनावाला आणि डॉ. टेस्सी थॉमस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.