पुणे (Pclive7.com):- राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान, काही भागात या पावसाचा शेती पिकांना मोठा फटकाही बसला आहे. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून देखील गेल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पावसाची गरज आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राती काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.