पिंपरी (Pclive7.com):- विद्वत्ता आणि विव्दानाची कधी तुलना होऊ शकत नाही. सर्वांनी नेहमी आपले कौशल्य एकमेकांशी संवाद साधत अद्ययावत ठेवावे. डॉक्टर आणि समाजातील सर्व घटकांचा संवाद असला पाहिजे. या संवादातून निर्माण होणारी ऊर्जा समाज हितासाठी खर्च झाली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. यातूनच निरामय, सुदृढ समाज निर्मिती होईल. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता हे खूप महत्वाचे आहे. वैद्यकीय व्यवसायात काम करणे म्हणजे समाजसेवेची चांगली संधी आहे. वैद्यकीय पेशा हे ‘नोबेल प्रोफेशन’ आहे, असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.
इंडियन डेन्टल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या ५६ व्या राज्य परिषदेचे उद्घाटन नांगरे पाटील यांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुजित विंचेकर, इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर माऊली फरांदे, वायसीएम रुग्णालायाचे दंतविभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. मनिष फरांदे, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. संदीप भिरूड, डॉ. निखिल दिवाण, डॉ. जुई तुपे, डॉ. दिपाली पटेकर, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. अमित पाटणकर, डॉ. सचिन कोचेकर आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना नांगरे पाटील म्हणाले की, वैज्ञानिक प्रगतीमुळे मोठ्याप्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरुण पिढी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करीत आहे. त्याचा प्रभाव वाढला आहे. मात्र या माध्यमांचा चुकीच्या पध्दतीने वापर होता कामा नये. तुम्ही स्विकारलेल्या वैद्यकीय पेशातून समाजाला काही तरी चांगले देऊ शकता. चांगल्या समाज निर्मितीस तो एक हातभार लागेल.
दिवस-रात्र काम करावे लागत असल्याने पोलीसांवर कामाचा फार ताण आहे. पोलीस आणि डॉक्टर यांच्यावर हल्ला होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. परंतु, आपण संघटीतपणे काम केल्यास अशा घटनांना लगाम घालू शकतो. स्वतःच्या शक्तीबद्दल माहिती, विश्वास नसेल तर विजय आणि पराभव यांचा सामना करावा लागेल. परंतु, शांततेच्या काळातच अधिक घाम गाळला तर युध्दाच्या काळात कमी रक्त सांडते. कधी मोठे व्हावे, कधी छोटे व्हावे तसेच कधी मृदू तर कधी कठोर व्हावे हे आपल्याला कळले पाहिजे. आपल्या स्वभावात व्देष, तिरस्कार, असुया नसावी. गुण व अवगुणांसह एखाद्याला स्वीकारणे म्हणजेच प्रेम होय, असेही नांगरे पाटील म्हणाले.
दरम्यान उद्घाटनप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नांगरे पाटील तसेच अन्य उपस्थितांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या स्वागतपर भाषणात डॉ. राकेश प्रसाद यांनी तीन दिवसांच्या परिषदेमध्ये होणा-या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. देशभरातून ४३०० दंत वैद्य आणि विद्यार्थी या परिषदेत सहभाग नोंदवला आहे. ॲटोक्लस्टर, सायन्स पार्क येथील सहा हॉलमध्ये एकुण ११८ चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो विद्यार्थी आपले पीएचडीचे प्रबंध सादर करणार आहेत. याबरोबरच दंत वैद्यकीय शास्त्रातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे देश-विदेशातील कंपन्यांचे स्टॉल कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले आहेत.
२६/११ हल्ल्याची पूर्व कल्पना होती…
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याची पूर्व कल्पना दीड-दोन महिने आधिच मिळाली होती. त्यावेळी मी आधिच हॉटेल ताजची रेकी केलेली असल्याने अतिरेक्यांच्या पाठोपाठ म्हणजे ११ मिनिटात घटनास्थळी पोचलो होतो. २३ व्या मिनिटाला अतिरेक्याला टिपले. अतिरेकी कोठे जाऊ शकतात, कोणत्या ठिकाणी आपण त्यांची कोंडी करू शकतो याची कल्पना मला असल्यानेच अतिरेक्यांच्या गोळीबाराला प्रतित्तोर देवून सुखरूप बचावलो. पुणेकर नागरिकांनी रेव्ह पार्टी कारवाईबाबत मला खूप सहकार्य केले. अमंली पदार्थांच्या व्यापारातून युवकांना टार्गेट केले जात आहे. सोशल मीडियाचे ॲडिक्शन आणि युवकांना पडलेला अमंली पदार्थांचा विळखा ही चिंतेची बाब असल्याचे विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. व्ही.व्ही.एस. वर्गीस, मनिषा यांनी केले. तर आभार डॉ. अभिजीत फरांदे यांनी मानले.