पिंपरी (Pclive7.com):- शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे आणि आवश्यक त्या सोयी सुविधांची पुर्तता करावी. तसेच संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत आढावा बैठक आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडली, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
या बैठकीस अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, बाबासाहेब गलबले, उप आयुक्त मनोज लोणकर, मिनीनाथ दंडवते, निलेश भदाणे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संयोजन समितीचे सुहास जोशी, संतोष पाटील, प्रणव जोशी, राजेंद्र भंग, मनोज डाळींबकर आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दि. ६ व ७ जानेवारी २०२४ या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरात रंगणार आहे. या काळात महापालिकेच्या काही सभागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून संमेलनात उपस्थित रसिक तसेच कलाकारांसाठी योग्य त्या सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या ठिकाणी देखील आवश्यक सोयी सुविधा महापालिका पुरविणार आहे. या सर्व कामकाजाचा आढावा आणि नियोजनाबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती घेतली.
अखिल भारतीय नाट्य परीषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे आयुक्त शेखर सिंह यावेळी म्हणाले. तसेच हे नाट्य संमेलन शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये भर घालणारे असून हा सोहळा संस्मरणीय राहण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
नाट्य परिषदेच्या प्रतिनिधींनी विविध कामकाजाबाबत रूपरेषा आणि माहिती दिली. महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देत असताना नाट्य परिषदेचे प्रतिनिधी देखील कामकाजनिहाय संबंधित विभागांशी समन्वय ठेवतील, असे भाऊसाहेब भोईर यावेळी म्हणाले.