पिंपरी (Pclive7.com):- आजकाल सर्व मुलांना बाहेरील चमचमीत खाद्यपदार्थ खायला आवडतात. मात्र, त्यामध्ये पोषणमूल्य अतिशय कमी असते. असे पदार्थ सातत्याने खाल्ल्यास भविष्यात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते, थकवा जाणवतो आणि त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. इतके घातक आहेत हे पदार्थ, असे मत प्रा. सुनील अडसुळे यांनी व्यक्त केले.
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमधे पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘जंकफुडचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रा. सुनील अडसुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका नीलम पवार, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रा. सुनील अडसुळे यांनी सांगितले, की जंक फूडचे दीर्घकालीन तोटे खूपच चिंताजनक आहेत. या पदार्थांमध्ये पोषक तत्वे कमी असतात. त्यामुळे दातांना कीड, मधुमेह, मूत्रपिंडाचे नुकसान, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, लठ्ठपणा असे आजार वाढत चालले आहेत. तसेच मुलांचा आत्मविश्वास कमी होऊन त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर विपरीत परिणाम होतो.
आरती राव यांनी सांगितले, की आपण असे पदार्थ विकत घेऊन स्वतःचे शरीराचे फक्त नुकसानच करून घेतो. जंक फूडमुळे मुलांना व्यसन लागण्याचाही धोका आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रणव राव यांनी घरगुती अन्न उत्तम पोषण देते. तर बाहेरील पदार्थांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत, असे आवाहन केले. मुख्याध्यापिका नीलम पवार यांनी आभार मानले.