पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यात मागील अडीच महिन्यांत सहा गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली. त्या अंतर्गत भोसरी येथील उजगरे आणि वाकड येथील आहिरराव टोळ्यांवर देखील ‘मोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
भोसरीतील टोळीप्रमुख पवन छगन उजगरे (रा. भोसरी), सुनील जनार्दन सकट (वय ३२), दीपक रामकिसन हजारे (२७, दोघे रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी, भोसरी) या टोळीवर सहा गुन्हे दाखल आहेत. तर वाकड येथील टोळीप्रमुख आदित्य ऊर्फ निरंजन शाम आहिरराव (३१, रा. तापकीरनगर, काळेवाडी), प्रतीक अशोक माने (२०, रा. थेरगाव), प्रेम संदीप तरडे (१९, रा. काळेवाडी) या टोळी विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या टोळीवर दहा गुन्हे दाखल आहेत.
टोळीतील सदस्यांनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला. अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी ‘मोका’ अंतर्गत कारवाईचे आदेश दिले. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, बापू बांगर, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दोन्ही टोळ्यांवर अनेक गंभीर गुन्हे..
उजगर आणि आहिरराव या दोन्ही टोळी प्रमुखांनी साथीदारांसह अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्यासाठी, गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशतीसाठी हिंसाचाराचा वापर करून भोसरी, वाकड, सांगवी, चतुश्रृंगी, सोलापूर, अहमदनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दुखापत, दंगा, मारामारी, बेकायदेशीररित्या हत्यारे, अग्निशस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.