पिंपरी (Pclive7.com):- सौरभ राव यांची त्वरित बदली करून पुण्याच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमोल थोरात यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सौरभ राव फेब्रुवारी २०१४ पासून अर्थात तब्बल चार वर्षांपासून कार्यरत आहेत. शासकीय सेवकांच्या बदल्यांसदर्भात नियमावली, मार्गदर्शक तत्वे आणि संकेतावली अस्तित्वात आहे. त्यानुसार शासकीय सेवक एकाच पदावर तीन वर्षे आणि एकाच जिल्ह्यात पाच वर्षे सेवा करू शकतात. विशेष बाब म्हणून या कालावधीत बदल करता येतो. त्यानुसार सौरभ राव पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी तब्बल चार वर्षांपासून सेवेत आहेत; मात्र सौरभ राव यांच्याकडून कामात हलगर्जी होत असून, त्यांचा बेजबाबदारपणा वाढला आहे.
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील दंगल केवळ प्रशासकीय बेजबाबदारपणाची परिणीती आहे. ‘विजयदिन’ आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम आदींबाबतचे महत्त्व, उपाययोजना, घ्यावयाची काळजी आणि नियोजन करण्याकडे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. विजयदिनी कोरेगाव भीमा येथे तब्बल सात ते आठ लाख अनुयायी येणार असल्याचा अहवाल संबंधित विभागांकडून देण्यात आल्यानंतरही सक्षम नियोजन आणि ठोस उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी राव यांनी उदासीनता दाखविली. केवळ काही हजार अनुयायी कोरेगाव भीमा येथे हजेरी लावतील, असे गृहीत धरून जिल्हाधिकारी राव यांनी विजयदिनाच्या नियोजनबाबत कामचलाऊपणा केला. दंगल उसळल्यानंतरही जिल्हाधिकारी राव यांनी तत्परता न दाखवता निर्णय घेण्यात कुचराई केली. परिणामी प्रकरण अधिक चिघळले आणि जिल्हाधिकारी राव यांच्या अकार्यक्षमतेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्वरित निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात जिल्हाधिकारी राव कमी पडले. त्यामुळे समाजकंटकांना संधी मिळाली आणि सरकारच्या विरोधकांनाही आयते कोलीत मिळाले. यातून पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि सरकार म्हणून भाजपची प्रतिमा मलीन झाली.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अकार्यक्षमतेचा फटका महाराष्ट्राला आणि सरकारला सहन करावा लागला. स्थानिक पातळीपासून राज्य आणि केंद्रातही भाजप सरकारकडून पारदर्शक आणि विकासाचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. सर्वसामान्यांकडून भाजपच्या कार्यशैलीला पसंती मिळत आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार भाजप सरकार कार्यरत आहे; मात्र काही जण याला बाधा निर्माण करीत आहेत. अशांपैकी जिल्हाधिकारी सौरभ राव एक असल्याचे ‘कोरेगाव भीमा’ प्रकरणावरून दिसून आले आहे. त्यामुळे सौरभ राव यांची त्वरित बदली करून जिल्हाधिकारीपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या निवेदनातून केली आहे.