पिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत आज लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या लाक्षणिक उपोषणामध्ये पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ), पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, ग्राहक पंचायत पिंपरी चिंचवड, जलदिंडी प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाउंडेशन, भावसार व्हिजन ‘इ’ पिंपरी चिंचवड, प्रदीप वाल्हेकर आणि टीम, स्वातंत्र्य वीर सावरकर मंडळ, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डी, फेडरेशन ऑफ घरकुल, सस्कार प्रतिष्ठान पुणे, कै. तुकाराम तनपुरे प्रतिष्ठान आदी संघटनांनी सहभाग घेतला.
लाक्षणिक उपोषणावेळी मावळ मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैजला मोरे, सभागृह नेता एकनाथ पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे,
शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले,
नगरसेवक अमित गावडे, नाना काटे, राजू मिसाळ, उत्तम केंदळे, सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, माजी शिक्षण मंडळ सभापती गजानन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, अमित गोरखे आदींनी उपोषणाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
पिंपरी चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘पीसीसीएफ’च्या मिस्ड कॉल मोहिमेस शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
लाक्षणिक उपोषणावेळी पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणा-या पत्रावर ६८३ जणांनी स्वाक्ष-या केल्या. तसेच लाक्षणिक उपोषण स्थळावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रत्येकाने सेल्फी घेऊन आपल्या फेसबुक अकाउंट तसेच सोशल मोदींवर अपलोड करून या मागणीला पाठिंबा दर्शवला. उपस्थित नागरिकांनी पुणे मेट्रो निगडीपर्यंत पहिल्या टप्प्यात व्हावी. त्यासाठी राज्यस्तरावर सक्रिय प्रयत्न करावेत. तसेच पिंपरी ते निगडी पर्यंत मेट्रोची गरज काय? याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले. मेट्रो प्रकल्प नागरिकांसाठी फायद्याचा आणि पर्यावरणपूरक आहे. तसेच वेळेची बचत करणारा असल्याने पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत न्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
तसेच महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार, महा मेट्रो आणि नागरिक यांच्या प्रतिनिधींना एका मंचावर येऊन या विषयावर चर्चा करणे आवश्यक आहे. वाढीव मार्गासाठी वाढीव निधी आणि अन्य बाबींसाठी ठोस उपाययोजना लवकरात लवकर करण्यात याव्यात. मेट्रोची सुविधा ही नागरिकांच्या सेवेकरिता आहे, त्यामुळे मेट्रो होत असताना नागरिकांची मते देखील जाणून घ्यायला हवीत. तसेच जे निर्णय शासन स्तरावर घेतले जातील, त्यांना नागरिकांपर्यंत पोहोचवणं देखील आवश्यक आहे, असे उपोषणकर्ते व संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेता एकनाथ पवार म्हणाले की, “पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत जावी, या मागणीसाठी आम्ही सर्व पहिल्या दिवसापासून तयार आहोत. त्यासाठी प्रयत्न देखील करण्यात येत आहेत. परंतु तत्कालीन सत्ताधा-यांनी पिंपरी पर्यंतच डीपीआर तयार केला असल्याने हा अडथळा येत आहे. महापालिकेने पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच डीपीआरचे काम पूर्ण होईल. त्यानंतर लगेच विविध स्तरांवर चर्चा व मंजुरी घेऊन पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत जाईल. महापालिकेला निधीची कमतरता नसून जो निधी वाट्याला येईल तो भरण्यास महापालिका तयार आहे, असा विश्वास पवार यांनी दाखवला.