इंद्रायणी नदीच्या नावाखाली गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी खिसे भरले
आळंडी (Pclive7.com):- मावळपासून आळंदीपर्यंत वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आळंदीतील सिद्धबेट येथे गुरुवारी (4 जुलै) एल्गार आंदोलन करण्यात आले. स्थानिक नागरिक, वारकरी, विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत,टाळ मृदंग वाजवत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ‘गजर’ केला. इंद्रायणीच्या प्रदूषणाचा मुद्दा गांभीर्याने घ्या, फक्त स्वतःचे खिसे इंद्रायणीच्या नावाखाली भरू नका” असे म्हणत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. भर पावसात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत वारकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. पावसातील आंदोलकांचा ‘नदी बचाव’ साठी सुरू असलेला ‘गजर’ लक्ष वेधून घेत होता.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240703-WA0026-300x200.jpg)
पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी अक्षरशः फेसाळलेली आहे. तेलकट तवंग दररोज पाण्यावर पसरलेला असतो. याबाबत स्थानिक प्रशासनापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही तोडगा निघालेला नाही. नुकतीच आषाढी पालखी वारी आळंदीतून निघाली. या वारी सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना प्रदूषित इंद्रायणीचे फेसाळलेले पाणी ‘आचमन’ करावे लागले. यामुळे वारकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या. या भावना सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना कळाव्यात. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी आळंदीतील सिद्ध बेट या ठिकाणी झालेल्या आंदोलनाला शहर शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, प्रभारी अशोक वाळके, शहर संघटक तुषार सहाणे, शहर युवासेना प्रमुख अजिंक्य रामभाऊ उबाळे, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन सानप, उपशहर प्रमुख कुणाल तापकीर, अनिल सोमवंशी, संतोष वाळके, युवराज कोकाटे, नेताजी काशीद, रावसाहेब थोरात, शैलेश मोरे, कैलास नेवासकर, दादा नरळे, अमित शिंदे, नितीन बोंडे, राजू जाधव, सागर रहाणे, सुरज झंझुरने, योगेश जगताप, काटे मामी, सुधाकर नलावडे, श्रीमंत गिरी, परशुराम आल्हाट, रूपाली आल्हाट, आशा भालेकर, शशिकला उभे, जना गोरे, दमयंती गायकवाड,अनिकेत येरूनकर, राजू खंडागळे, योगेश सोनवणे, माऊली बोऱ्हाडे, गणेश काळे, गणेश ताजने, अनिल तापकीर, मनीषा पवार, राहुल पवार, उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) माजी नगरसेविका सुलक्षणा धर शीलवंत, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष दिलीप पानसरे, समन्वयक माजी नगरसेवक गणेश भोंडवे, हेमंत बलकवडे, माणिकराव चव्हाण, सुनील कस्पटे राजेंद्र कदम, संपत पानसरे,विनायक रणसुभे सागर चिंचवडे उपस्थित होते. काँग्रेस उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र राज्याचे न्याय विभाग उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर आल्हाट, ज्ञानेश्वर बोराडे, सागर तापकीर, किशोर तेलंग, मंगेश खंडागळे, योगेश सोनवणे, दिलीप पानसरे, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष सागर लष्करे आधी उपस्थित होते.
यावेळी संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या की, नदीची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. नदीत मोठ्या प्रमाणात वाहून आलेली जलपर्णी, त्या जलपर्णीमुळे तेथील पाण्यातील जलजचर प्राण्यांचे जीव धोक्यात आला आहे. नदी काठच्या गावातील व महापालिकेचे मैला मिश्रित सांडपाणी थेट नदीत जाते. मात्र दुसरीकडे ट्रीटमेंट प्लांटच्या नावाखाली स्थानिक नेत्यांच्या बगलबच्चांना कोट्यावधींचे ठेके देण्यात आलेले आहेत. शहरातील अनेक कारखान्यातील केमिकल युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी नदी पात्रात सोडल्याने, त्याचा काहीसा रंग बदलून पिवळसर झालेला आणि ते जलप्रदूषित पाणी बंधाऱ्यातून खाली पडले की त्या प्रदूषित पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा पांढरा शुभ्र फेस. आणि तो तरंगत असणारा फेस दूरवर पर्यंत जाताना दिसत आहे. जलप्रदूषणामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आळंदीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शना करीता भाविक ही येत असतात. तसेच ते इंद्रायणी काठी येऊन पवित्र इंद्रायणी नदी मध्ये स्नान करतात तसेच पवित्र जल आचमन करतात. त्यामुळे नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते. जलप्रदूषणा मुळे नदी काठच्या गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात इंद्रायणी जलप्रदूषणामुळे केळगावातील नागरिकांना अशुद्ध (काळसर रंग) पाण्याचा पुरवठा झाला होता. स्नान करण्यासाठी सुद्धा अयोग्य असा पाणी पुरवठा त्यावेळी झाला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे जलप्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली नाही त्याला शासन जबाबदार आहेत. तसेच या जलप्रदूषणा वर आळा बसण्यासाठी जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्कता आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून इंद्रायणी नदी वाहते. म्हणून दरवर्षी जलपर्णी काढणे, नाल्यांची सफाई, ट्रीटमेंट प्लांट, रिव्हर सायक्लोथॉन अशी दुकानदारी पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सुरू आहे. सत्ताधारी भाजपने या दुकानदारीच्या नावाखाली कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे. इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्यामुळेच इंद्रायणीची आज गटारगंगा झाली आहे. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी आंदोलनात करण्यात आली.