पिंपरी (Pclive7.com):- ‘शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत’, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात केली. त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. ‘शरद पवारांवर टीका कराल, तर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसेल’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिला आहे. तर ‘पवारांवर आरोप करणे चुकीचे आहे, ते टाळणे सर्वच पक्षांसाठी हिताचे ठरेल’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
पुण्यातील बालेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अमित शाह यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहे’, अशी टीका केली. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे अनेक नेतेही नाराज झाले. याबाबत माजी आमदार लांडे आणि आमदार बनसोडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.
विलास लांडे म्हणाले की, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असे वाटते की, केंद्रीय मंत्र्यांनी या पद्धतीने बोलणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार यांना भटकती आत्मा’ असे म्हटले होते. या विधानाचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले होते. खरे तर, भाजपने ही चूक सुधारणे अपेक्षित होते. मी कोणाचाही व्यक्तिद्वेष करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आम्ही आमचे दैवत मानतो. त्यांचे वय ८४ वर्षे आहे. मला वाटते, त्यांच्या बाबतीत नेत्यांनी जास्त बोलू नये आणि बोलले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकेल. अशा प्रकारची टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवडणार नाही. आम्हा सर्व नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते महत्त्वाचे आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिले आहे.