पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज मागे घेतला. तूरडाळ व्यवहार प्रकरणात पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात गिरीश बापट यांनी मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
अब्रूनुकसानीचा दावा केल्या प्रकरणी आज सुनावणी होती, यासाठी गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक दोघेही शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले. गिरीश बापटांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यासंदर्भात सुनावणी झाली. गिरीश बापट यांच्यावर करोडो रुपयांचा तूर डाळ घोटाळा केल्याचा आरोप मलिकांनी केला होता. जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या तूरडाळीत २ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा सहभाग आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
तूरडाळीच्या किंमती भडकल्यानंतर कॅबिनेट सेक्रेटरी पी.के. सिन्हा यांनी विविध राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर, १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सिन्हा यांनी कायद्यानुसार या डाळीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ‘जप्त डाळीचा जाहीर लिलाव करणार’ ही सरकारची घोषणा फसवी आहे. डाळीचे साठे जप्त केले असताना चालढकल का? राज्यातील जनतेच्या ताटातील डाळ चोरणाऱ्याया साठेबाज व्यापार्यांवर काय कारवाई केली, असे सवालही मलिक यांनी केले होते. या आरोपांनंतर बापट यांनी मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला होता, तो आज मागे घेतला आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप हे व्यक्तीगत स्वरुपाचे नव्हते. ते सरकारच्या धोरणाविरोधात होते. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मी हा दावा मागे घेतला असल्याचे बापट यांनी सांगितले.