पिंपरी (Pclive7.com):- जल, जमीन आणि जंगल यावरील आदिवासी जनतेच्या हक्क अधिकाराचा लढा उभारुन त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे थोर क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांचे कार्य नवोदित पिढीसाठी सतत मार्गदर्शक आणि प्रेरक राहील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच त्यांच्या जयंती निमित्त महापौर माई ढोरे यांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य वित्त व लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, उप आयुक्त आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, माजी नगरसदस्या आशा सुपे, सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे, दत्तात्रय कोकाटे, नामदेव रढे, डॉ. संतोष सुपे, नानासाहेब तिटकारे, रमेश साबळे, साहेबराव सुपे, संजय बांबळे आदी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी जननायक बिरसा मुंडा यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला. ब्रिटीश राजवटीविरुध्द क्रांतीचा लढा उभारुन त्यांनी आदिवासींवरील होणा-या शोषण आणि अन्यायाला वाचा फोडली. वंचित समूहाला हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी बिरसा मुंडा यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.
आयुक्त राजेश पाटील यांनी बिरसा मुंडा यांच्या संघर्ष कार्याची माहिती यावेळी विशद केली. ते म्हणाले, आदिवासी समूहाच्या न्याय हक्कासाठी आणि उन्नतीसाठी बिरसा मुंडा यांनी लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांविरुध्द त्यांनी यासाठी उठाव केला. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना भगवान संबोधले.
बिरसा मुंडा यांनी केलेले कार्य आणि स्मृती सर्वांसाठी प्रेरणा देणारे असून जीवनाला सतत मार्ग दाखविणारे ठरेल असे आयुक्त पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच जयंती निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.